अ‍ॅपशहर

खारफुटीला जगवणारा प्राध्यापक

वडील वनखात्यामध्ये. त्यामुळे निसर्गाशी नाते जन्मापासूनच जुळलेले. शाळेत असताना डोंगरावर भटकंतीला जाण्याची आवड मनात रुजली आणि हे नाते गहिरे झाले. मग एक दिवस घरातच साप आढळला. त्याला मारायचे नाही तर वाचवून त्याच्या अधिवासात सोडून द्यायचे ठरवले आणि प्रा. भूषण भोईर यांच्या मनात सर्पमित्र म्हणून जाणीवजागृती झाली.

महाराष्ट्र टाइम्स 30 Nov 2019, 6:29 pm
मुंबई: वडील वनखात्यामध्ये. त्यामुळे निसर्गाशी नाते जन्मापासूनच जुळलेले. शाळेत असताना डोंगरावर भटकंतीला जाण्याची आवड मनात रुजली आणि हे नाते गहिरे झाले. मग एक दिवस घरातच साप आढळला. त्याला मारायचे नाही तर वाचवून त्याच्या अधिवासात सोडून द्यायचे ठरवले आणि प्रा. भूषण भोईर यांच्या मनात सर्पमित्र म्हणून जाणीवजागृती झाली. सर्पमित्र म्हणून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास सध्या निसर्गमित्र अधिक अधोरेखित होत आहे. त्यांनी शिरगाव येथे खारफुटीमध्ये साचलेले प्लास्टिक काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना खारफुटीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे दहा हेक्टर परिसरात खारफुटीची खुंटलेली वाढ आता जोमाने होताना दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a professor dedication towards mangroves
खारफुटीला जगवणारा प्राध्यापक


पालघरच्या सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी महाविद्यालयात भोईर शिकवतात. त्यांनी बीएस्सीच्या पहिल्या वर्षाला सर्पमित्र म्हणून काम केले. त्यानंतर वनविभागासोबत अनेक ठिकाणी जाऊन याविषयी जनजागृती केली. याशिवाय केळवे, शिरगाव येथे बिबळ्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगही केले. परिसरातील मच्छिमारांच्या जाळ्यात कासव अडकले की ते पहिल्यांदा भोईर यांना फोन करतात.

शिरगाव परिसरातील खारफुटी वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा त्यांच्या विद्यार्थ्यांनाही अभिमान वाटतो. गेली तीन वर्षे हे विद्यार्थी प्रा. भोईर यांच्यासोबत खारफुटीमध्ये स्वच्छतेचे काम करत आहेत. खारफुटी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची खारफुटीशी ओळख करून देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष खारफुटी दौरा आयोजित केला. त्यावेळी खारफुटी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले गेले आणि त्या स्वच्छतेने जादू केली. कचरा, प्लास्टिक खारफुटीच्या मुळांवर अडकून राहिल्याने खारफुटीची वाढ खुंटते. ती झाडे मरूनही जातात. मात्र ही स्वच्छता झाल्यानंतर खुरटलेली झाडे जोमाने वाढू लागल्याचे त्यांना आढळले. मुळे मोकळी झाल्यावर झाडे श्वासोच्छवास करू शकली आणि केवळ दुसऱ्या वर्षी जिथे स्वच्छता झाली तिथली झाडे माणसाच्या उंचीएवढी झाल्याचे दिसले. जिथे स्वच्छता झाली नव्हती तिथली रोपटी मात्र खुरटलेलीच होती. निसर्गामध्ये जाणवलेल्या या बदलाचा सकारात्मक परिणाम होऊन ही स्वच्छता मोहीम आणखी वेग घेऊ लागली आहे.

ही खारफुटी समुद्रातील जैवविविधतेसाठी महत्त्वाची ठरतात. मात्र अजूनही याचे नेमके महत्त्व आपल्याला माहीत नाही. अनेकदा निसर्गसंपत्ती गमावल्यानंतर उमटणाऱ्या पडसादांमुळे आपल्याला त्याचे महत्त्व कळते. हेच महत्त्व त्याचा नाश होण्याआधी ग्रामस्थ, परिसरातील स्थानिक यांना सांगण्याचा भोईर प्रयत्न करत आहेत. त्यांचे काम केवळ खारफुटींपुरते मर्यादित नाही तर विकासाच्या नावाखाली निसर्गामध्ये होणाऱ्या मानवी हस्तक्षेपाबद्दलही ते सांगतात. त्यांना यासाठी रोषालाही सामोरे जावे लागते. पण तरी त्यांचा लढा प्रत्यक्ष कृतीतून लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. सूर्या नदीची उपनदी असलेल्या पाणेरी नदीसाठीही त्यांनी जनजागृती मोहीम राबवली आहे. कमीत कमी गरजा, अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक प्रयत्न, मातीचे घर अशी काही स्वप्ने त्यांना प्रत्यक्षात आणायची आहेत. त्याचे महत्त्व लोकांना सांगण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मी आहे पृथ्वीरक्षक!

पर्यावरण रक्षणासाठी अनेक हात आज आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. आपले आणि पर्यायाने पृथ्वीरक्षणासाठी पुढे सरसावलेल्या अशाच पृथ्वीरक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या कार्याला समाजासमोर आणण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'पृथ्वीरक्षक' हा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपास कोणी एखादी मोहीम राबवत असेल, पर्यावरण जागृतीसाठी धडपड करत असेल तर अशा व्यक्ती, ग्रुप्स, सोसायट्यांची माहिती आम्हाला जरूर कळवा. 'पृथ्वीरक्षक' या उपक्रमाद्वारे अशा पर्यावरणप्रेमींच्या कार्याची दखल आम्ही घेऊ. आपली माहिती आणि संपर्क क्रमांक आम्हाला mtpruthvirakshak@gmail.com या मेल आयडी वर जरूर कळवा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज