म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशव्यापी बंदमुळे शाळेतील शिक्षक गैरहजर राहिल्याने चक्क विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन शाळेचे नियमित वर्ग सुरू ठेवल्याची अनोखी घटना घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये घडली. बुधवारच्या बंदमुळे सकाळच्या सत्रात एकही शिक्षक हजर नसल्याने या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेची परवानगी घेऊन शाळा चालविण्याचा निश्चय केला. शाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नियमित वर्ग वेळापत्रकाप्रमाणे चालविले.
सरकारच्या आर्थिक तसेच कामगार विरोधी धोरणाला विरोध म्हणून विविध संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये शिक्षकांच्या काही संघटना सहभागी झाल्याने मुंबईतील अनेक शाळांमध्येही आज बंद पाळण्यात आला. यामध्ये घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलच्या शिक्षकांचाही समावेश होता. मात्र असे असूनही शाळेतील विद्यार्थ्यांनी आपत्तीव्यवस्थापनांतर्गत मागील दोन वर्षांपासून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर आपली शाळा यशस्वीपणे सुरू ठेवल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
प्रथमत: मुख्याध्यापिका फरिदा सनदे यांची परवानगी घेऊन नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विषयाच्या तासिकेप्रमाणे विषय व वर्ग वाटून घेऊन उपस्थित विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू केले. दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी नववी व दहावीचे वर्ग तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग चालवले.
विद्यार्थ्यांमधील या धाडसी निर्णयक्षमतेमागे शाळा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध बाबींचे प्रशिक्षण असल्याचे कळते आहे. याच मार्गदर्शनाचा उपयोग करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण शाळा व त्यांतील शैक्षणिक कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवले. यावेळी गौरी जाधव या दहावीच्या विद्यार्थिनीने मुख्याध्यपिकेची तर अथर्व शेळके या विद्यार्थ्याने उपमुख्याध्यपकांची भूमिका निभावली. माध्यमिक विभागाच्या ३६ विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेत २८ वर्गांतील सर्व तासिका नियमितपणे पार पाडल्याची माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद फाटक यांना दिली.
------------
रेल्वे बंद, आंदोलने, पाऊस यामुळे पुरेसे शिक्षक शाळेत उपस्थित न राहिल्यास २९ वर्ग नियंत्रित करणे शक्य होत नाही. या स्थितीत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत विद्यार्थ्यांना शाळा नियंत्रण करण्याचे प्रशिक्षण शिक्षकांमार्फत गेल्या दोन वर्षांपासून दिले जात आहे. त्यामुळे शाळेत पालकांनी मुलांना सोडून गेल्यानंतर ते पुन्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी येईपर्यंत या मुलांना वर्गात बसविणे, त्यांना ईलर्निंग सुविधेद्वारे शिकविणे, वरिष्ठ वर्गातील मुलानी कनिष्ठ इयत्तेतील मुलांचे शैक्षणिक वर्ग घेणे यासारखे प्रशिक्षण यापूर्वीच मुलांना दिले असल्याने आजच्या संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी असतांना नियमित शाळा सुरु ठेवणे शक्य झाले.
- फरिदा सनदे, मुख्याध्यापिका, शिवाजी शिक्षण संस्था, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग,