म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अंधेरी वेरावली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी भांडुप-मरोशी मुख्य जलवाहिनी पवई येथे सोमवारी मध्यरात्री अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तर जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. घाटकोपर, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले आदी भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला व नागरिकांना या प्रकाराची माहितीही मिळाली नाही. घाटकोपर परिसरातील नागरिकांनी जवळच्या इमारती, सोसायट्यांमध्ये जाऊन तेथून काही हंडे, भांडी भरून पाणी आणले व ते काटकसरीने वापरले. जोगेश्वरी परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. मात्र जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान कमी दाबाने पाणी आले, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.