अ‍ॅपशहर

प्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन करायची गरज नसते; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Aaditya Thackeray's Reply To Opposition)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 29 Apr 2021, 10:06 am

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर
  • दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री घटनास्थळी का जात नाहीत, याविषयी मांडली भूमिका
  • विरोधकांना हाणला सणसणीत टोला
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे
मुंबई: नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळती, विरार रुग्णालयातील आगीच्या प्रकरणाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी पुन्हा एकदा टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? घटनास्थळी का जात नाहीत? असे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांच्या या आक्षेपांना चोख उत्तर दिलं आहे. (Aaditya Thackeray's Reply To Opposition)
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांची सुरुवातीपासूनच एक भूमिका आहे. कुठलीही दुर्घटना घडल्यास ती हाताळण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा राबत असते. मग इमारत पडली असेल किंवा आग लागली असेल. अशा घटनांनंतर तिथं पोलीस, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व पत्रकार आपापली कामं करत असतात. अशा प्रसंगी कुणी व्हीआयपी तिथं गेल्यास गोंधळ उडतो. कारण, व्हीआयपींसोबत त्यांचा स्वत:चा मोठा ताफा असतो. त्यामुळं काम करणाऱ्या यंत्रणांचं लक्ष विचलित होतं. तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. असं काही होऊ नये हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.'

वाचा: 'मोदी सरकारनं आता तरी राजकीय ईर्षा सोडावी'

नाशिकच्या दुर्घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांनी मत मांडले. 'नाशिकच्या घटनेनंतर पालकमंत्री व आरोग्यमंत्री घटनास्थळी गेले होते. त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. राज्याच्या प्रमुखांनी वॉररूममध्ये राहून सगळीकडं देखरेख ठेवणं अपेक्षित असतं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री हे काम करतात. सध्याच्या परिस्थितीत आपले मुख्यमंत्री केंद्र व राज्यामध्ये सांगड घालण्याचं काम करत आहेत,' असं त्यांनी सांगितलं.

'एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्यातील पीडितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत कशी मिळेल हे पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळी टीव्हीवर येऊनच सांत्वन करायला हवं असं काही नाही. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री, लोकप्रतिनिधी असतात. तेही तिथं त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात आणि एकत्र काम केल्यानंतर सगळ्यांनी टीव्हीवर जायची गरज नसते,' असा सूचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी हाणला.

वाचा: भुकेलेले अस्वल जेव्हा हॉटेलमध्ये घुसते...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज