म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेसमधील एका कुटुंबाला सत्ता जाण्याची जेव्हा भीती वाटते तेव्हा ते देश संकटात सापडल्याचा डंका पिटतात. देशात भीतीचे वातावरण असल्याचे सांगत आम्हीच देशाला वाचवू शकतो, अशी हाकाटी काँग्रेस देते. ज्यांच्या पक्षात लोकशाही नाही ते लोकशाहीची भाषा करीत आहेत. एका कुटुंबासाठी काँग्रेसने घटनेचा दुरुपयोग करीत १९७५मध्ये देशात आणीबाणी लागू केली आणि सत्तेच्या लालसेपोटी संपूर्ण देशाला संकटात टाकले, नागरिकांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले गेले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर केली.
इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना देशात आणीबाणी लागू झाली त्याला ४३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसमधील एका कुटुंबाने आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याची भीती दाखवून जनतेला धमकावले. देशात धाडसत्र सुरू झाले. राजकीय कार्यकर्त्यांच्या अटकसत्राने कारागृहे भरून गेली होती. प्रसारमाध्यमांवर बंधने लादली गेली. न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवण्यात आला. महाप्रचंड असे अराजक तेव्हा माजले होते. तरीही हा काळा दिवस पाळला जात नाही. लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी म्हणून या काळ्यघ् दिवसांचे स्मरण प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
(आणीबाणी, महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता!)