मुंबई: विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. पण, आता मात्र, अशा वाहनांना जप्त करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास जखमी, मृतास कोणत्याही प्रकारचे विमालाभ मिळत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनधारकाने विमा घेऊन आल्यानंतर आणि अधिकृत दंड भरल्यानंतरच त्याला वाहनाचा ताबा देण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. याशिवाय ज्या वाहनाचा विमा नजीकच्या काळात संपणार आहे त्यांना पत्राद्वारे तशी सूचना पाठविणारी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. राज्यातील बेरोजगार तरुण, बचतगट आदींना हे काम देण्यात यावे. यासाठी होणारा खर्च वाहनधारकांकडून घेता येईल. यामुळे रोजगार निर्माण होण्याबरोबरच वाहनधारकांचीही सोय होऊ शकेल, अशी सूचना रावते यांनी बैठकीत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ओव्हरलोड मालवाहतूक वाहनांवर होणार गुन्हा दाखल
राज्यातील अनेक खासगी प्रवासी वाहने (ट्रॅव्हल्स) हे पार्सल वाहतूक, कुरिअर वाहतूक किंवा मालवाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रॅव्हल्स वाहनांना फक्त प्रवासी वाहतुकीसाठी परवाने देण्यात आले आहेत. पण अनेक ट्रॅव्हल्स बेकायदेशीरपणे मालवाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवरही कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिरिक्त भार वाहणाऱ्या (ओव्हरलोड) मालवाहतूक वाहनांवर फक्त दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. अशा ओव्हरलोड वाहनांमुळे अपघात होण्याबरोबरच रस्त्यांची अवस्थाही खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणारे स्पीड गव्हर्नर तोडणाऱ्या खासगी वाहनांवरही कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
अवजड वाहनांबाबत प्रबोधन करा
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी अवजड वाहनांबाबत सूचना केली. महामार्गावर बऱ्याच वेळा अवजड वाहने उजव्या बाजूने वाहतूक करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, अपघात होतात. अशा वाहनचालकांनी डाव्या बाजूने वाहन चालविण्याबाबत त्यांचे माहितीपत्रकांद्वारे प्रबोधन करण्यात यावे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी. रस्त्याची उजवी बाजू ओव्हरटेकसाठी खुली राहील याबाबत वाहतूक पोलीसांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्यमंत्री केसरकर यांनी यावेळी दिल्या.