आता सुनावणीनंतर होणार कारवाई
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रस्ते घोटाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील चौकशीत दोषी आढळलेल्या ११ कंत्राटदारांना पालिकेने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशींना उत्तर देण्याची पंधरा दिवसांची मुदत १७ एप्रिलला संपली आहे. आता या कंत्राटदारांची सुनावणी होणार असून, त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
दीड वर्षांपूर्वी पालिकेत रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने पहिल्या टप्प्यातील ३४ रस्त्यांच्या अहवालातील दोषी कंत्राटदार व आधिकाऱ्यांवर काही महिन्यांपूर्वी कारवाई केली. या कारवाईतील अधिकारी व कंत्राटदारांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल पूर्ण झाला असून, त्यात ११ कंत्राटदार दोषी आढळले आहेत. या कंत्राटदारांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
पालिकेने दिलेली पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतर कंत्राटदारांनी आणखी पंधरा दिवस वाढवून मागितले होते. ही मुदतही नुकतीच संपली आहे. दोषी कंत्राटदारांची पालिकेतील नोंदणी तात्पुरती रद्द करण्यात आली असून, त्यांना यापुढे पालिकेची नवीन कंत्राटे न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
चौकशीत दोषी आढळलेल्या कंत्राटदारांवर थेट एफआयआर केल्यास बचावाची कोणतीही संधी न दिल्याचा दावा करून ते न्यायालयात दाद मागू शकतात. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. सुनावणीनंतर कारवाईसाठी पालिकेच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.