अ‍ॅपशहर

राज्यात पावसाची स्थिती पाहून कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं 'हे' महत्वाचं आवाहन

हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2021, 5:13 pm

हायलाइट्स:

  • राज्यातील अनेक भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही
  • पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता
  • कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं महत्तवाचं आवाहन
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers-representative-toi.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : यंदा राज्यात चांगल्या पर्जन्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र जून महिना संपत आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पेरणी करावी की नाही, याबाबतचा संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
राज्यात खरिपाच्या सुमारे २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

पुढील आठवड्यात काय आहे पावसाचा अंदाज?

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक २२ जून २०२१ च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला होता.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून २२ जूनपर्यंत राज्यात सुमारे २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ३८ टक्के पेरण्या झाल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज