अ‍ॅपशहर

विमान प्रवाशांची संख्या वाढली

सप्टेंबर महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतातील देशांतर्गत विमान वाहतूक १६.४ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ९५ लाख ८३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमानप्रवास केला, तर त्याच महिन्यात गेल्यावर्षी ८२ लाख ३० हजार विमानप्रवासी देशात होते.

Maharashtra Times 30 Oct 2017, 4:19 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air travellers increased in india
विमान प्रवाशांची संख्या वाढली


सप्टेंबर महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतातील देशांतर्गत विमान वाहतूक १६.४ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ९५ लाख ८३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमानप्रवास केला, तर त्याच महिन्यात गेल्यावर्षी ८२ लाख ३० हजार विमानप्रवासी देशात होते. सप्टेंबर हा पावसाळ्याचा व पर्यटनाच्या हंगामापूर्वीचा तसा कमी प्रवासाचा काळ असूनही त्यात विमानप्रवासी संख्या वाढली आहे, त्याचे हवाई वाहतूक क्षेत्रात स्वागत होत आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाची ताजी प्रवासीसंख्या नुकतीच प्रसिध्द झाली असून त्यात हा तपशील समोर आला आहे. या ताज्या आकडेवारीनुसार इंडिगो एअरलाइन्सकडे सर्वाधिक ३६ लाख ६५ हजार विमान प्रवासी होते, तर जेट एअरवेजद्वारे १४ लाख ७७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पाइसजेटमधून १३ लाख २० हजार प्रवाशांनी प्रवास केला. कर्जाच्या ओझ्यामुळे दबलेल्या एअर इंडियाच्या विमानांतून १२ लाख ९३ हजार प्रवाशांनी सप्टेंबर महिन्यात प्रवास केला. तर गो एअरने ८ लाख ९ हजार प्रवाशांनी विमानप्रवास केला. एअर एशियाच्या विमानांतून ३ लाख ९४ हजार प्रवासी होते, तर विस्तारा या तुलनेने नव्या विमान कंपनीच्या विमानांतून ३ लाख ६२ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

विमानातील प्रवासी लोड फॅक्टर म्हणजेच विमानातील आसनांच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येचे गुणोत्तर हे स्पाइसजेटने सर्वाधिक नोंदले आहे. स्पाइसजेटचा प्रवासी लोड फॅक्टर ९४.२ टक्के राहिला, तर गो एअरचा ८८.५ टक्के आणि इंडिगोचा ८५.२ टक्के होता.

विमान कंपन्यांनी विमाने रद्द होणे, विलंब अशा विविध कारणांसाठी १ लाख २२ हजार प्रवाशांना २ कोटी ६२ लाख रुपयांची भरपाई दिली. विमानांना झालेल्या विलंबासाठी एक लाख प्रवाशांना १ कोटी १३ लाख रुपये भरपाई द्यावी लागली. विमानांच्या वक्तशीरपणामध्ये इंडिगोचा क्रमांक पुन्हा वर आला आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद व बेंगळुरू या विमानतळांवरील वक्तशीरपणाच्या क्रमवारीत इंडिगोचा वक्तशीरपणा ८९.८ टक्के होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज