म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
झपाट्याने वाढणाऱ्या मुंबईत मोकळा श्वास घ्यायचे म्हटले, तरी ते सध्याच्या वातावरणात शक्य नाही. ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, धूळ, झाडांची घटणारी संख्या, वाहनांची वाढती संख्या यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडतो आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे आवश्यक असून ही झाडे कधी, कुठे, कशी लावावीत, याबाबत मुंबईकरांना मार्गदर्शन करण्यासाठी विकास आराखड्याच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने वृक्ष आराखडा तयार करावा, असा प्रस्ताव नुकताच पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईत सुमारे ३५ लाखांच्या आसपास वाहने असून दरवर्षी दोन हजारांहून अधिक नवीन इमारती, टॉवरचे बांधकाम सुरू होते. वाहनांमुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून नवीन बांधकामांमुळे रेती, सिमेंटची धूळ हवेत मिसळते. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना बसतो. दमा व इतर श्वसनविकारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हवेच्या वाढत्या प्रदूषणाला पर्याय म्हणून प्राणवायू देणाऱ्या लाखो झाडांची संख्या वाढायला हवी. मात्र, ही झाडे कुठेही, कशीही लावून त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली पाहिजे, यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिकेसमोर वृक्ष आराखड्याचा पर्याय ठेवला आहे.
पालिकेच्या विकास आराखड्यात विविध ठिकाणच्या भूखंडांवर आवश्यकतेप्रमाणे विविध आरक्षणे निश्चित करण्यात येतात. त्यानुसार भूखंडांचा विकास केला जातो. त्याच धर्तीवर रस्ते, समुद्रकिनारे, गृहनिर्माण संकुले, औद्योगिक संकुले या ठिकाणी कोणती झाडे लावणे आणि त्याचे संवर्धन व संगोपन करणे याबाबतची माहिती मुंबईकरांना मिळेल, असा आराखडा तयार करणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे. पालिका दरवर्षी हजारो झाडांची लागवड करत असली तरी त्यास तज्ज्ञांमार्फत शास्त्रशुद्ध आराखड्याची जोड मिळाल्यास झाडांची संख्या झपाट्याने वाढू शकेल. यासाठी हजारो मुंबईकर पुढे येण्यास तयार आहेत. पालिकेने असा आराखडा बनवावा, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी या प्रस्तावात केली आहे.