म. टा. प्रतिनिधी, मुंबई
विमानतळावर येणारे व बाहेर जाणारे प्रत्येक वाहन १०० टक्के निर्जंतूक केले जात असल्याचा दावा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) केला आहे. यासाठी विशेष सोय करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू झाली आहे. याअंतर्गत दररोज साधारण ५ हजार प्रवाशांची ये-जा सुरू आहे. या प्रवाशांची ने-आण करण्यासाठी वाहनांची वर्दळ आहे. या प्रत्येक वाहनाच्या चालकाची रितसर आरोग्य तपासणी करण्याची सोय विमानतळावर करण्यात आली आहे. तसेच या वाहनाची अल्कोहोलआधारित द्रव्याने १०० टक्के निर्जंतुकीकरण होत आहे. प्रत्येक वाहनाची, चालकाची व वाहनातून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशाची विस्तृत माहिती नोंदवली जात आहे.