अ‍ॅपशहर

राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे मी तर सांगायलाच नको : अजित पवार

सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्या वाढत्या जवळिकतेवर बोलताना अजित पवार यांनी सूचक विधान केलं. राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे मी तर सांगायलाच नको, असं अजितदादा म्हणाले.

Edited byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2022, 9:16 pm
मुंबई : रोखठोक आणि स्पष्टवक्ते स्वभावासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची ओळख आहे. रंगात आलेल्या भाषणात खास टोले टोमणे मारुन विरोधकांना कोपरखळ्या मारण्याचं काम अजितदादा अनेक वेळा करतात. आजही विधान परिषदेत बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्या वाढत्या जवळिकतेवर बोलताना त्यांनी सूचक विधान केलं. राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे मी तर सांगायलाच नको, असं अजितदादा म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याची आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajit Pawar Vidhan parishad Speech wishesh Sadabhau Khot Farewell ceremony
अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)


अजित पवार आज विधान परिषदेत बोलत होते. यावेळी ते आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श करत होते. दरम्यान ७ जुलै २०२२ रोजी कार्यकाळ संपून निवृत्त होत असलेल्या १० विधान परिषद सदस्यांचा सभागृहात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभ पार पडला. यात सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. सदाभाऊ खोत यांच्या कार्यकाळाचं अजितदादांनी थोडक्यात वर्णन केलं. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

"२०१४ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि शेवटच्या टप्प्यात स्वाभिमानीच्या कोट्यातून सदाभाऊंची विधान परिषदेत एन्ट्री झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सदाभाऊंना राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. मात्र याच काळात त्यांचा आणि राजू शेट्टी यांचा हात सुटला. आता ते एकटेच खूप पुढे चाललेले आहेत", असा टोला अजितदादांनी लगावला.

अजितदादांनी सदाभाऊंची फिरकी घेतली

"सदाभाऊ खोत यांची फिरकी घेताना अजित पवार म्हणाले, "मधल्या काळात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकल्या, वेगवेगळ्या बातम्याही कानावर येत असतात. कधी कधी ते जयंत पाटील यांच्याशीही खूप गप्पा मारत बसतात. आता काय गप्पा मारतात, हे काही माहिती नाही", असं अजितदादा म्हणताच सभागृहात खसखस पिकली. अजितदादांनाही हसू अनावर झालं.

"सदाभाऊंचं आणि जयंत पाटलांचं पहिलं काही एवढं जमायचं नाही. पण राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे मी तर सांगायलाच नको", असं अजितदादा म्हणाले. सदाभाऊ आणि जयंत पाटलांच्या मैत्रीचा विषय झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा सदाभाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे वळविला. "सदाभाऊंचा ड्रेस एकदम पांढरा शुभ्र झालाय. पूर्वीसारखा आंदोलनाने रापलेला चेहरा आता रापलेला दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नवं तेज आलंय. हे तेज असंच राहो", असं म्हणत सदाभाऊंना पुढील वाटचालीसाठी अजितदादांनी शुभेच्छा दिल्या.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख