मुंबई
मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'इनसाइड द एम्प्टी बॉक्स' या विषयवर पालेकर बोलत होते. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यात सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. केंद्र सरकारवर या कार्यक्रमात टीका करू नका, असे पालेकर यांना बजावले. भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकर चांगलेच संतापले. पालेकरांना बऱ्याचदा रोखल्याने अखेर त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले व खूर्चीवर जावून बसले.
अमोल पालेकर यांचा अर्धवट भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एखादी व्यक्ती भाषण करीत असताना त्या व्यक्तीला मध्येच भाषण करण्यापासून कुणी थांबवते का? असा सवाल करीत अमोल पालेकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अमोल पालेकर यांचे 'चितचोर', 'घरौंदा', 'गोलमाल', 'मेरी बीवी की शादी', 'बातों-बातों मे', 'नरम-गरम', 'श्रीमान-श्रीमती' यासारखे चित्रपट गाजलेले आहे. 'गोलमाल' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा 'फिल्मफेयर पुरस्कार'ही मिळालेला आहे.
असहिष्णुतेचा अंत आता जनताच करेल: काँग्रेस
देशपातळीवर गेल्या पाच वर्षापासून असहिष्णुतेचे वातावरण पहायला, अनुभवायला मिळते आहे. अमोल पालेकर यांना बोलू न देणे ही घटना त्याचाच एक भाग आहे. लोकशाही विचारधारेला घातक असलेल्या मोदी सरकारचे केवळ काही महिनेच शिल्लक राहिले असल्याने या असहिष्णुतेचा अंत आता जनताच करेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अमोल पालेकर यांना भाषण करू न देण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करून सावंत म्हणाले की, असहिष्णू विचारधारा भारतीय नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी हुकुमशहा मुसोलीनीची भेट घेऊन ही विचारधारा भारतात आणली. गोळवलकरांनी हिटलरबद्दल असलेल्या प्रेमातून या विचारधारेची जोपासना केली. संघाच्या विविध शाखांमधून या विचारधारेचा अंमल गेली अनेक वर्ष केला जात आहे. परंतु आता स्वतः संघ प्रचारकच पंतप्रधान झाल्याने शासकीय यंत्रणामार्फत ही विचारधारा रूजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.