अ‍ॅपशहर

मेरे पास ना घर ना द्वार, क्या करेगी बुलडोझर सरकार?: अमृता फडणवीस

राज्यातील भाजपची सत्ता गेल्यापासून नव्या सरकारवर सातत्यानं टीकेची झोड उठवणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता ठाकरे सरकारला नवी उपमा दिली आहे. (Amruta Fadnavis again criticises Thackeray government)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2020, 8:03 am
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील तू-तू मै-मै सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर सुरू झालेल्या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अमृता यांनी आता ठाकरे सरकारला 'बुलडोझर सरकार' म्हणून हिणवलं आहे. (Amruta Fadnavis again criticises Thackeray government)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray-Amruta Fadnavis


मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. बार, रेस्टॉरंट सुरू असताना मंदिरे बंद का? तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात का? असा प्रश्न राज्यपालांनी केला होता. राज्यपालांच्या या पत्रावरून एकच गदारोळ माजला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या पत्रास सडेतोड उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे सुनावले होते. मुख्यमंत्री व राज्यपालांच्या या वादात अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली होती. 'बार आणि दारूची दुकाने सर्रास उघडी आहेत. पण मंदिरे धोकादायक ठरवण्यात आली आहेत. हे सगळं पाहिल्यावर काही लोकांच्या समंजसपणाचं पुरावा म्हणून प्रमाणपत्राची गरज लागते. वाह रे प्रशासन! असं ट्वीट अमृता यांनी केलं होतं.

वाचा: खडसेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या... त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,' असा इशारा विशाखा राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला होता.

वाचा: 'राज्यपालांनी कसं वागू नये हे कोश्यारींनी दाखवून दिलंय'

अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या या टीकेला ट्विटरद्वारे अत्यंत तिखट शब्दांत उत्तर दिलं आहे. 'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार?', असा प्रश्न त्यांनी केला आहे. ठाकरे सरकारला त्यांनी बुलडोझर सरकार म्हणून हिणवलं आहे. शिवसेनेविरोधात पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेनं नुकतीच कारवाई केली होती. त्याचा संदर्भ अमृता यांच्या या टीकेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज