अ‍ॅपशहर

पुनर्विकास कधी होणार?

अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास हा धारावीचा कळीचा मुद्दा. दक्षिण भारतीय आणि मुस्लिमांचे आधिक्य, इतर मिश्र लोकवस्ती यामुळे मोदी लाटेतही ही जागा काँग्रेसने राखली होती.

महाराष्ट्र टाइम्स 15 Oct 2019, 9:52 am
अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास हा धारावीचा कळीचा मुद्दा. दक्षिण भारतीय आणि मुस्लिमांचे आधिक्य, इतर मिश्र लोकवस्ती यामुळे मोदी लाटेतही ही जागा काँग्रेसने राखली होती. जनमानसांत असलेली स्वच्छ प्रतिमा आणि तळागाळातील दांडग्या लोकसंपर्काच्या जोरावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड गेली १५ वर्षे धारावीच्या आमदार राहिल्या आहेत. यंदाही संभाव्य विजेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र मागील वर्षाची मतांची आकडेवारी यंदाची युती त्यांना डोकेदुखी ठरू शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम assembly elections 2019 dharavi
पुनर्विकास कधी होणार?


२०१४ विधानसभा निवडणूक निकाल

उमेदवार पक्ष मिळालेली मते

वर्षा गायकवाड काँग्रेस ४७,७१८

बाबूराव माने शिवसेना ३२,३९०

दिवया ढोले भाजप २०,७६३

हनुमंता नंदेपल्ली अपक्ष ५,३३३

२०१९ चे उमेदवार

वर्षा गायकवाड : कॉंग्रेस

आशीष मोरे : शिवसेना

संदीप केवडे : मनसे

मनोज संसारे : एआयएमआयएम

समस्या -

- वाहतूककोंडी

अरुंद रस्ते, अनधिकृत हातगाड्या आणि बेशिस्त फेरीवाले यांच्या कृपेने धारावीतील रस्त्यांना वाहतूककोंडीने घट्ट विळखा घातला आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका अपघातस्थळी वेळेत पोहोचतील की नाही ही चिंता स्थानिकांना सतावत असते. छोट्या-मोठ्या अतिक्रमणांमुळे मुख्य रस्त्यांचा आकार हळूहळू इतका अरुंद होत चालला आहे की, चारचाकी सोडा; दुचाकीही आपल्या चाळीपर्यंत नेणे स्थानिकांना कठीण जाते आहे.

- गटार, कचऱ्याचे साम्राज्य आणि बरंच काही..

धारावी हा कामगारांचा परिसर असल्याने अनेक छोटे-मोठे उद्योग येथे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे येथील गटारांतून कापडगिरणीतील कपडा, फोमचा कपडा, प्लास्टिक इतर उद्योगधंद्यातील सांडपाणी वाहून जात असते. गटारे तुडुंब भरलेली असतात. तरीही गटारसफाईचे काम होत नाही. पावसाळ्यात हे पाणी रस्त्यांवर येते. परिणामी, अस्वच्छता वाढत चालल्याने रोगांचा प्रादुर्भावही वाढतो आहे. धारावीत खानावळी, हॉटेल्सही मोठ्या संख्येने आहेत. या दोहोंतील कचरा अनेकदा खुलेआम रस्त्यांवर टाकला जातो. याबाबत कुठल्याही यंत्रणेचा धाक या खानावळी, हॉटेलांवर राहिलेला नाही.

- पुनर्विकासाचा प्रश्न कायम

अनेक वर्षांपासून शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे धारावीचा सर्वांगीण पुनर्विकास रखडला असून फक्त मोठाले प्रोजेक्ट्स येताहेत या आश्वासनांवर आम्ही जगतो आहोत असे स्थानिकांचे म्हणणे आहे. विभागात नवे शौचालय बांधणे, अथवा जुन्यांची पुनर्बांधणी करून देणे आणि मतदारांना खुश ठेवणे हेच अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण कार्य. प्रत्यक्षात धारावीचा पुनर्विकास कधी होणार हा येथील सर्वसामान्य मतदारदारांना पडलेला मोठा प्रश्न आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज