दोन एसआरपीएफ जवानांसह उपनिरीक्षक जखमी
राज्यात लॉकडाऊन काळात २२९ ठिकाणी पोलिसांवर हल्ले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
लॉकडाउनच्या कालावधीत पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुरुवारी सायंकाळी तरुणांच्या जमावाने ॲन्टाप हिल येथे पोलिसांवर शस्त्राने जमावाचा हल्ला केला. या हल्ल्यात एसआरपीएफच्या दोन जवानांसह पोलिस उपनिरीक्षक जखमी झाला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात २२९ ठिकाणी पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
वस्त्यांमधून विनाकारण कोण बाहेर पडू नये, वचक राहावा यासाठी गुरुवारी सायंकाळी अॅन्टॉप हिल पोलिसांनी रूट मार्च काढला होता. हे संचलन कोकरी आगार परिसरात सुरू असताना या ठिकाणी काही तरुण घोळक्याने उभे असल्याचे पोलिसांनी पाहिले. 'गर्दी करू नका, विनाकारण घराबाहेर पडू नका, आपापल्या घरी जा,' असे पोलिसांनी त्यांना सांगितले. यातील अनेकांनी मास्कही घातले नव्हते. याबाबत हटकले असता हे तरुण पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले. पोलिस समज देत असताना १० ते १२ जणांचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी धारधार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एसआरपीएफचे दोन जवान आणि अॅन्टॉप हिल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक असे तिघे जखमी झाले. या तिघांना आधी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून त्यांना सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी १५हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२९ ठिकाणी पोलिसांवर हल्ले
लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडण्यास मनाई आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्यामध्ये २२९ ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले असून यामध्ये ८५ पोलिस जखमी झाले आहेत. याप्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून ८०३ जणांना अटक करण्यात आली आहे.