अ‍ॅपशहर

वडिलांचे गाणे टिकवण्यासाठी प्रयत्न केला

वडिलांची गाणी जेवढी जमली तेवढी मी गाऊन ठेवली आहेत. आजही बाबांची गाणी म्हणूनच रियाझाला सुरुवात करते. त्यांची गाणी माझ्या आवाजातील ऊर्जा कायम ठेवतात. माझ्या वडिलांचे गाणे टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आहे, असे हृद्य मनोगत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 25 Apr 2018, 5:29 am

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र टाइम्स.कॉम asha-bhosale


वडिलांची गाणी जेवढी जमली तेवढी मी गाऊन ठेवली आहेत. आजही बाबांची गाणी म्हणूनच रियाझाला सुरुवात करते. त्यांची गाणी माझ्या आवाजातील ऊर्जा कायम ठेवतात. माझ्या वडिलांचे गाणे टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आहे, असे हृद्य मनोगत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले. षण्मुखानंद सभागृहामध्ये रंगलेल्या ७६व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आशा भोसले यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबीयांनी संगीताला दिलेले योगदान पुढील १०० वर्षे तरी विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.

या सोहळ्यानिमित्त आशा भोसले यांनी 'भाळी चंद्र असे धरीला' हे नाट्यपद गाऊन मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीची झलक रसिकांना दाखवली. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मास्टर दीनानाथ स्मृति पुरस्कार सोहळ्यामध्ये नेहमीच खुर्च्यांवर बसून इतरांना सन्मान दिला आहे असे सांगताना त्यांनी वडिलांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान असल्याचीही भावना उलगडली. हा पुरस्कार मोलाचा आहे. गेली ७५ वर्षे गात आहे आणि यापुढेही गात राहणार असे सांगत त्यांनी रसिकांना या पुरस्काराच्या निमित्ताने हे स्वर कायम त्यांच्यासोबत असतील असे जणू आश्वस्त केले.

यावेळी संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी सात सुरांचे नाते, स्वर, लय यांचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे असते असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. संगीत हे मनाला मोहवणारे हवे, त्यात गुणवत्ता हवी हेही त्यांनी नमूद केले.

चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी या पुरस्कारामुळे अनोखी ऊर्जा मिळाली असून एखाद्या नवोदिताच्या उत्साहाने काम करणार असल्याची भावना मांडली. या पुरस्काराची रक्कम त्यांनी आशा भोसले आनंदमयी पुरस्कारार्थी आणि कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या सेंट्रल सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ डेफ अध्यक्षा मेरी बेहिलहोमजी यांच्या संस्थेला देत असल्याची घोषणा व्यासपीठावरून केली. संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी या पुरस्कारांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपल्याबद्दल त्यांनी आनंदमयी पुरस्कार स्वीकारताना ऋण व्यक्त केले.

नाट्यसेवेसाठीचा विशेष पुरस्कार संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन यांना देण्यात आला. तर प्रदीर्घ साहित्यसेवेसाठी वाग्विलासिनी पुरस्कार देऊन रजनीगंधा, आनंद यासारख्या चित्रपटांमधील गाणी अजरामर करणाऱ्या कवी, गीतकार योगेश यांना गौरवण्यात आले. नाट्य क्षेत्रातील विशेष पुरस्कार सध्या गाजत असलेल्या अनन्या या नाटकाला देण्यात आला. निर्माते राजेश पाटील आणि कांचन भट यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. याच नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रताप फड, अभिनेते प्रमोद पवार, ऋतुजा बागवे आणि सिद्धार्थ बोडके यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. मंगेशकर कुटुंबीयांनी केलेल्या सन्मानामुळे अनन्याच्या यशाला विशेष कोंदण मिळाल्याचे यावेळी प्रमोद पवार यांनी सांगितले.

बिरजू महाराजांचा कलाविष्कार!

या सोहळ्यामध्ये उद्योजक धनंजय दातार आणि वरिष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनाही गौरवण्यात आले. उपस्थितांचे आणि पुरस्कार्थींचे हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर यांनी चाफ्याची परडी देऊन खास स्वागत केले. पुरस्काराच्या या सोहळ्यानंतर पं. बिरजू महाराज आणि शाश्वती सेन, पं. अनिंदो चॅटर्जी आणि पं. अजय चक्रवर्ती यांच्या कलाविष्काराने या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी लता मंगेशकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळीउषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, वारणीसाचे स्वामी ओमा उपाध्याय आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज