म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
यंदाही मागील वर्षाप्रमाणेच अतिवृष्टी झाली तर पावसाच्या पाण्यातून चालत येणाऱ्या मुंबईकरांनी लेप्टोपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. साचून राहिलेल्या वा दूषित पाण्यामधून चालल्यामुळे पायाला जखमा होऊ शकतात वा आधीच असलेल्या जखमांमधून संसर्ग होण्याचीही शक्यता लक्षात घेऊन डॉक्सीसायक्लीन ही गोळी घेण्याचा सल्लाही दिला आहे. ज्यांना संसर्ग होऊ शकतील अशा कोणत्याही प्रकारच्या जखमा पायांवर नाहीत अशा व्यक्तींनी लेप्टोचा संसर्ग टाळण्यासाठी पाण्यातून चालल्यानंतर २४ ते ७२ तासांच्या अवधीमध्ये ही एक गोळी वैद्यकीय सल्ल्याने घ्यायची आहे.
लेप्टोस्पायरोसिस हा आजार 'लेप्टोस्पायरो' या सूक्ष्मजंतुमुळे होतो. 'लेप्टोस्पायरा' हे सूक्ष्मजंतू उंदीर, कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी यांच्या मूत्रात आढळतात. मात्र त्यांच्यामध्ये लेप्टोची लक्षणे दिसत नाहीत. संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेले पाणी व माती यांच्यामधून माणसाला या जंतूंचा संसर्ग होतो. त्वचेला झालेला संसर्ग, डोळे, नाक यामधून जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. पावसाळ्यात तसेच तुंबलेल्या पाण्यातून चालताना शरीराला असलेल्या जखमांमधून हा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांनी लेप्टोची लागण होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने तातडीने जवळच्या पालिका रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दूषित पाण्यातून दीर्घकाळ चालत आलेल्या व्यक्ती, पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डॉक्सीसायक्लिन ही गोळी रोज एक याप्रमाणे सहा आठवडे घ्यायची आहे. तर ज्यांच्या पायाला, तळव्याला वा त्वचेवरील कोणत्याही जुन्या जखमा असतील अशा व्यक्तींनी तीन दिवस २०० मि.ग्रॅ.ची गोळी २४ ते ७२ तासांच्या अवधीत घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पायावरील त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या जखमा असलेल्या वा नसलेल्या गरोदर महिलांनी पाचशे मि. ग्रॅ.ची अॅजिथ्रोमायसिन ही गोळी दिवसांतून एकदा २४ ते ७२ तासांमध्ये घ्यायची आहे. आठ वर्षांखालील मुलांना लेप्टोचा संसर्ग टाळण्यासाठी अजिथ्रोमायसीन सिरप किंवा २५० मि.ली. ग्रॅम मात्रेची गोळी देणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.