अ‍ॅपशहर

Husain Dalwai: बाबरी खटल्याच्या निकालावर हुसेन दलवाईंनी व्यक्त केली 'ही' भीती

Husain Dalwai बाबरी मशीद खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता होते हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे. निकालाच्या अनुषंगाने दलवाई यांनी अनेक मुद्द्यांवर बोट ठेवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2020, 4:57 pm
मुंबई: बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशी भीती काँग्रेस नेते, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे. ( Husain Dalwai On Babri Masjid Verdict )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम हुसेन दलवाई


वाचा: बाबरी: देशातील ज्युडीशरी 'मोदीशरी'कडे चाललीय; काँग्रेस खासदाराची मोठी टीका

बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या. यात हजारो निष्पापांचा बळी गेला. १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? इतकेच नव्हे तर अनेक जण मशीद तोडण्यासाठी लागणारी औजारेसुद्धा घेऊन गेले होते. याचे पुराव्यासह वृत्तांकन वृत्तपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिले आहे. तरीही या कटात सहभागी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते हे अत्यंत धक्कादायक व अनाकलनीय आहे, असे दलवाई यांनी पुढे नमूद केले आहे.

वाचा: 'जादूनं पाडली मशीद?' ओवैसींचा प्रश्न

बाबरी मशीद खटल्याप्रकरणी निर्णयानंतर काही लोक मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. शुभेच्छा देत आहेत. हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ठ लोकांना अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते, असे दलवाई म्हणाले.

निकालाचे आश्चर्य वाटले नाही: नवाब मलिक

बाबरी मशीद प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटले नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले आहे. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर अगोदर देशभरात झालेले कार्यक्रम आहेत. त्याच आधारावर केस तयार करण्यात आली होती. शेवटी हा न्यायालयाचा निकाल आहे त्याचा आम्ही आदर करतो असेही नवाब मलिक म्हणाले.

वाचा: बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत; दिली 'जय श्रीराम'ची घोषणा

शिवसेनेने केले निर्णयाचे स्वागत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने बाबरी प्रकरणी निकालाचे स्वागत केले आहे. बाबरी मशिदीच्या बाबतीत जे काही घडले त्यात कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता हे आता न्यायालयानेही नमूद केले आहेत. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता. आता या साऱ्या गोष्टी मागे सोडून पुढे जायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

वाचा: 'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज