अ‍ॅपशहर

ठाकरेंच्या तैलचित्रावरून रंगले राजकारण, चित्रकार चंद्रकला कदम यांच्याकडून नाराजी व्यक्त

सरकारी पातळीवर चित्र निवड होते तेव्हा चांगली चित्रे आणि वाईट चित्रे यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. सरकारी स्तरावर होणाऱ्या कामांच्या वेळी केवळ काही कलावंतांनाच ही संधी सातत्याने कशी मिळते? - ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 25 Jan 2023, 6:50 am
मुंबई : विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात लावलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्रकार किशोर नादावडेकर यांचे तैलचित्र सोमवारी लावण्यात आले. या निर्णयानंतर चित्रकार चंद्रकला कदम यांनी आपली नाराजी व्यक्त करत २१ ऑक्टोबर २०२२ला त्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे चित्र मध्यवर्ती सभागृहात लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नादावडेकरांकडे त्यांच्या चित्राची निवड मध्यवर्ती सभागृहात लावण्यासाठी झालेली आहे, अशा आशयाचे पत्र नाही. मात्र कदम यांच्या चित्राची निवड झाल्याचे समोर आल्यानंतर कला जगतातील काही ज्येष्ठ चित्रकारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या चित्राच्या मागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम balasaheb thackeray oil painting


घटनाक्रम

- चंद्रकला कदम यांना त्यांचे चित्र मध्यवर्ती सभागृहात लावले जाईल असे सांगण्यात आले होते. १० जानेवारीला या चित्राच्या संदर्भात त्यांचा सत्कार करण्यात येईल असेही सांगण्यात आले. त्यांच्यापर्यंत निमंत्रण पोहोचले नव्हते अशी माहिती चंद्रकला कदम यांचे पती कुमार कदम यांनी दिली.

- १३ जानेवारीला कदम यांनी चित्र सादर केले.

- २१ जानेवारी रोजी कदम यांना त्यांचे चित्र मुख्यमंत्री कार्यालयात लावण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.

- ज्या कारणासाठी चित्र घेतले आहे, त्याच कारणासाठी ते लावावे असा आग्रह कदम यांनी धरल्याने मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे सांगितल्याची माहिती कुमार कदम यांनी दिली.

- २२ जानेवारी रोजी संपर्क साधून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या दालनात हे चित्र लावण्यात येईल असे सांगितले.

सरकारकडून मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये नादावडेकर यांचीही निविदा होती. मात्र त्यांना ११ जानेवारीला मुख्यमंत्री कार्यालयातून ठाकरे यांचे चित्र काढायचे असल्याचा फोन गेला. त्यांना यासंदर्भात अधिकृत पत्र मिळालेले नव्हते. त्यांना एक दिवस आधी या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते मात्र त्यांचेच चित्र अंतिमतः मध्यवर्ती सभागृहात झळकेल हे २३ जानेवारीला संध्याकाळी त्यांना सांगण्यात आले.

ठाकरे यांच्या चित्रावरून झालेल्या राजकीय चर्चेपलीकडे आता कला जगतातील राजकारणाची चर्चा रंगली आहे. निविदा काढून, अधिकृत पत्रव्यवहार होऊन निर्णय झालेला असताना तो अवघे १२ दिवस आधी कसा बदलला, नादावडेकरांना अधिकृत पत्र का दिले गेले नाही, चित्र बदलण्याचा निर्णय कोणत्या पातळीवरून झाला असे प्रश्न या निमित्ताने चर्चेत आले आहेत. चित्र नाकारण्याची कारणे लिखित स्वरूपात स्पष्ट व्हावीत अशीही मागणी कदम यांनी केली आहे.

दिग्गजांची कदमांबाबत नाराजी

कदम यांनी काढलेले तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर कलाजगतातील काही दिग्गज मंडळींनी नाराजीही व्यक्त केली होती. सातत्याने केवळ एकाच व्यक्तीला हे काम कसे मिळते, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. तसेच लोकांच्या पैशांमधून असे चित्र काढून घेतले जाते तेव्हा समिती नेमली जाते. त्यामध्ये सरकारी अधिकारी, सरकारमधील कलेशी संबंधित व्यक्ती आणि ज्येष्ठ अनुभवी चित्रकाराचा समावेश असणे अपेक्षित असते. अशा पद्धतीने चित्राची अंतिम निवड होणे अपेक्षित होते, असे मत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज