अ‍ॅपशहर

म्हणून प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातच हवेत; 'या' मंत्र्याचं वक्तव्य

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू असतानाच बाळासाहेब थोरातच प्रदेशाध्यक्ष पदावर राहिले पाहिजे. - महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 23 Jan 2021, 7:39 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदावर राहिलेच पाहिजे


काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू असतानाच बाळासाहेब थोरातच प्रदेशाध्यक्ष पदावर राहिले पाहिजे. पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले. अ. भा. काँग्रेसचे सचिव आणि राज्याचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी. एम. संदीप यांच्यासमोर यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.

प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी नवीन पदाची सूत्रे हाती घेतली. हा पदग्रहण सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे. तर काँग्रेस पक्षातील महिलांनी एकत्र येऊन थोरात यांची ताकद वाढवायला हवी, असे सव्वालाखे यांनी सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या १२ ते १३ जागा येतील, असे बोलले जात होते. तेव्हा कोणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते. पक्ष सत्तेत नसतानाच्या काळात पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रत्येकाला बरोबर घेऊन चालणे, त्यांच्यामागे ताकदीनिशी उभे राहण्याचे काम थोरात यांनी केले आहे. यामुळे आणि पक्षातील सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेसच्या विधानसभेत ४४ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे थोरात प्रदेशाध्यक्ष राहिलेच पाहिजे, पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज