अ‍ॅपशहर

काँग्रेसमधील नाराजीनाट्याचा अहवाल अखेर लिफाफाबंद; आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात बदलाची शक्यता

काँग्रेसमधील नाराजीनाट्य समोर आल्यानंतर याची दखल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली होती. आता या वादाचा अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2023, 6:34 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्रानंतर उघड झालेल्या काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला. यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल अंतिम केला. तो २६ फेब्रुवारीला रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या अहवालामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अनेक बदल सूचविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patole vs balasaheb thorat


नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बंडखोरीनंतर प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनीही पक्षश्रेष्ठींकडे नाराजी मांडणारे पत्र पाठवले. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. या सगळ्याची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी रमेश चेन्निथला यांची याप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली. त्यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार चेन्निथला तीन दिवसांपासून मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या. दादरच्या टिळक भवनामध्ये सोमवारी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. मंगळवारी नरिमन पॉईंट येथील हॉटेलमध्येही अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश होता. बाळासाहेब थोरात यांनीही चेन्निथला यांची येथेच भेट घेतल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील पक्ष संघटन मजबूत आहे. आगामी निवडणुकीला प्रदेश कार्यकारिणी खंबीरपणे सामोरे जाईल, असा विश्वास चेन्निथला यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. रायपूर येथे २६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे अधिवेशन आहे. त्यावेळी ते आपला अहवाल सादर करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या अहवालात त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांबाबत काही सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन अहवालात मांडतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज