म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांत सोमवारी संपूर्ण शहरात आवाजाची पातळी चढीच राहिली. 'डीजे' वाजवण्यास मनाई असली तरीही चौपाट्यांवर आवाज टिपेला पोहोचला होता.
विलेपार्ले येथे आर्य विद्या मंदिर शाळेजवळ सायं. ७.४० वाजता बँजोचा आवाज १०२.७ डेसिबल एवढा नोंदला गेला. जुहू कोळीवाडा येथे नाशिक ढोलचा आवाज रात्री ८.२० वाजता १०७.५ डेसिबल, माहीमच्या व्हिक्टोरिया चर्चजवळ रात्री ९.२० वाजता ड्रमचा आवाज १०४ डेसिबल, सिद्धिविनायक मंदिराजवळ रात्री ९.३४ वाजता नाशिक ढोलचा आवाज ९०.२ डेसिबल, वरळी नाक्याला रात्री ९.४७ वाजता बँजोचा आवाज १०६.५ डेसिबल इतका होता तर बँजोचाच आवाज याच ठिकाणी रात्री १०.४८ वाजता ११२.६ डेसिबल इतका नोंदला गेला. गिरगाव चौपाटीलाही हा आवाज ड्रम, लाऊडस्पीकरचा आवाज ९४ डेसिबल इतका होता, अशी माहिती आवाज फाऊंडेशनतर्फे देण्यात आली. गिरगाव चौपाटीवर तर पोलिसांसमोरच हा आवाज एवढ्या मोठ्या प्रमाणात होता तरी कोणतीही कारवाई होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत डीजेमुळे मोठा आवाज होत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सोमवारी विसर्जनादरम्यान पारंपरिक ढोलताशा वाजवूनही आवाजाची पातळी तेवढीच होती. या वाद्यांना भोंग्याची साथ मिळाल्याने हा आवाजाचा स्तर अनेक पटीने वाढला, अशी माहिती आवाज फाऊंडेशनचे संजय साळुंके यांनी दिली.
पोलिसांकडून हरकत नाही
मुंबईतील प्रत्येक विसर्जन स्थळाजवळ आणि विसर्जन मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. मिरवणुकीतील आवाजाची पातळी कानठळ्या बसवणारी असूनही यावर हरकत घेतली जात नव्हती. यासंदर्भात पाच दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
आवाज संहिता काय सांगते?
- गणेशोत्सवादरम्यान रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत (शिथिल केलेल्या चार दिवसांत रात्री १२ ते सकाळी ६) लाऊडस्पीकरचा वापर नको. इतर वेळेत वापर करताना आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबलपर्यंत आणि रात्री ४५ डेसिबलपर्यंतच असावी.