अ‍ॅपशहर

विसर्जन न होणारा बाप्पा!

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्तम आदर्श कांदिवली चारकोपच्या प्रबोधनकार ठाकरे नगर सेक्टर १ सार्वजनिक उत्सव मंडळाने घालून दिला आहे...

Maharashtra Times 17 Sep 2018, 6:43 am
कौस्तुभ तिरमल्ले, पाटकर-वर्दे कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bapapa without immersion
विसर्जन न होणारा बाप्पा!


मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्तम आदर्श कांदिवली चारकोपच्या प्रबोधनकार ठाकरे नगर सेक्टर १ सार्वजनिक उत्सव मंडळाने घालून दिला आहे. या मंडळाच्या गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर केला जात नाहीच, शिवाय एकच मूर्ती विसर्जित न करता पुन्हापुन्हा वापरली जाते. मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावण्याचा या मंडळाचा हेतू स्तुत्यच म्हणावा लागेल.

महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजेच गणेशोत्सव. हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी गणपतीची भव्य, आकर्षक मूर्ती बनवण्यावर, तितक्याच भव्यदिव्य सजावटीत ती विराजमान करण्यावर भर दिला जातो. अलीकडे तर पाद्यपूजन, आगमन सोहळेही मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले आहेत. मात्र, या उत्साहादरम्यान पर्यावरणास होणाऱ्या हानीविषयी अजूनही बरीच जनजागृती होणे आवश्यक आहे. असे असतानाच, प्रबोधनकर ठाकरे नगर सेक्टर १ सार्वजनिक उत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे.

'आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहोत. म्हणूनच आम्ही ही एकच गणेशमूर्ती अनेक वर्षे वापरतो. जेणेकरून मूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण कमी होइल. शिवाय संपूर्ण सजावटीमधे थर्मोकोल किंवा प्लास्टिकचा अजिबात वापर केला जात नाही. आवश्यक त्या ठिकाणी कागद आणि कापडाचा वापर केला जातो', असे या मंडळाचे सचिव शशांक चौकीदार म्हणाले.

'गणेशमूर्तीवर होणारा खर्च वाचत असल्याने त्या पैशातून आम्ही गरीब आदिवासी, गरजू मुलांना मदत करतो. या वर्षापासून आम्ही 'एक वही-एक पेन' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही भाविकांकडून एक वही व पेन दान म्हणून घेतो आणि ते गरजू मुलांना देतो. शिवाय लहान मुलांनी बनवलेल्या कलेचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येते. दहाही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात', असे चौकीदार पुढे म्हणाले.

'आमच्या मंडळाच्या गणपतीला ३० वर्षे पूर्ण झाली असून, या गणपतीला चारकोपमधे खूप मान आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत किमान दहा हजार भक्त या गणपतीच्या दर्शनाकरिता येतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आमच्या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत असून, अनेक मंडळेही आमच्या सारखी स्वयंभू गणेशमूर्ती आणण्याचा विचार करत आहेत', असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज