म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेवरील मशिद स्थानकात विनातिकीट सापडलेल्या बसंती बकरीचा ताबा आता 'पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट' (पेटा) या संस्थेने घेतला आहे. बसंती बकरीच्या मालकाने स्थानकावरून पळ काढल्यानंतर, रेल्वेने नियमानुसार केलेल्या लिलावात अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीने २,५०० रुपयांची बोली जिंकली. मात्र पश्चिम बंगालमधील आपल्या घरी बसंतीस घेऊन जाण्याचे रहमान यांचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. 'पेटा' संस्थेने बकरीचा ताबा घेऊन देखभालीसाठी तिची रवानगी सांगलीला करण्याचा निर्णय घेतला आहे.
मशिद स्थानकात ३१ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने बकरीसोबत प्रवेश केला असता, तिथे तिकीट तपासनीसाने त्याला अडवले. बकरीचे तिकीट नसल्याने बकरीच्या मालकाने तिथून पळ काढला. त्यानंतर या बकरीस सीएसएमटी येथील पार्सल विभागात आणण्यात आले. रेल्वे नियमांनुसार, बसंती बकरीचा लिलाव पुकारण्यात आला. त्यास प्रतिसाद देत अब्दुल रहमान यांनी तिची देखभाल करण्याच्या उद्देशाने या लिलावात बोली लावली. बसंती या बकरीला आपल्या घरी नेण्याचे रहमान यांचे स्वप्न होते. मात्र आता पेटा या संस्थेने बकरीचा नव्याने ताबा घेतला आहे.
बसंतीसाठी २,५०० रुपयांची बोली लावणाऱ्या रहमान यांना पेटाने एकूण खर्चापोटी पाच हजार रुपये दिले आहेत. बसंतीचे नवीन आश्रयस्थान सांगलीत असेल, असे स्पष्ट झाले आहे. सध्या पेटा संस्थेच्या अंधेरीतील कार्यालयात बसंतीची काळजी घेतली जात आहे.