म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कोकणच्या भूमीत विनाशकारी प्रकल्प उभे करण्याचा घाट घातला जात असून, ते वादग्रस्त प्रकल्प दुसरीकडेही होऊ शकतात. कोकणातील जमिनी विध्वंसक प्रकल्पांसाठी नाहीत. त्यामुळे तुमच्या जमिनी अशा प्रकल्पांना देऊ नका. जमिनी बळकावणाऱ्या परप्रांतियांच्या उद्योगापासून सावध राहण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. तुमच्या हातातून एकदा जमीन गेली की तुम्हाला कोणी विचारणार नाही, असे सांगत कोकणातील गावागावात मनसेच्या शाखा उघडण्याचे आदेश राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज ठाकरे यांनी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात मनसेच्या कोकणवासीयांचा मेळावा घेतला. कोकणातले प्रश्न, उद्योग, रस्ते यासारख्या प्रश्नांबाबत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी सडकून टीका केली. कोकणातील लोकांनी जमिनीवर आणि समुद्रावर लक्ष ठेवावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी द्रष्टेपणाने समुद्रावर लक्ष केंद्रित केले. नेमके त्यांच्या याच गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्राला आठ भारतरत्न मिळाले असून, त्यापैकी बहुतांश कोकण पट्ट्यातील आहेत. कोकणाने खूप मोठ्या व्यक्ती देशाला दिल्या असून, आम्ही काय करतोय? गणपतीपुरते कोकणात येतो. वाडी-बिडी बघायची आणि परत यायचे. यापलीकडे कोकणात तुम्ही काय बघताय, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
कोकणात येऊ घातलेले सर्व प्रकल्प कोकणाची वाट लावणारे आहेत. हे प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरीत करता येऊ शकतात. त्यासाठी कोकणातील जमिनीची गरज नाही. कोकणातील पर्यटनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. केरळची भूमी कोकणासारखीच आहे. पण केरळ पर्यटनात पुढे असून, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ आणि इच्छाशक्ती लागते. कोकणातल्या लोकांना पर्यायाची गरज आहे. कोकणातले नवे रस्ते उखडले असून, तेथील कंत्राटदारांना तुम्ही जाब विचारला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. नाशिकचे कंत्राटदार आम्हाला घाबरून असायचे. म्हणून तिथल्या रस्त्यांवर खड्डे नाहीत. कोकणातल्या कंत्राटदारांना तुम्ही आपल्या पद्धतीने जाब विचारला पाहिजे. कोकणातील लोकांना आपण आहोत याचा आधार वाटला पाहिजे, असे ते म्हणाले.
'भविष्यातील यशाची सुरुवात कोकणातूनच'
कोकणात गणपतीला जात आहात. तुमच्या गावातील मनसैनिकाला बळ द्या. कोकणातल्या प्रत्येक गावात मनसेची शाखा सुरू झालीच पाहिजे, असे साकडे त्यांनी कोकणातल्या कार्यकर्त्यांना घातले. मनसे स्थापन झाल्यानंतर पहिले यश कोकणातून आले होते. खेडमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळाले होते. भविष्यातील यशाची सुरुवात कोकणातूनच होईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.