म. टा. विशेष प्रतिनिधी
चुनाभट्टी-बीकेसी जोडपुलामुळे बीकेसीच्या अंतर्गत भागात निर्माण झालेली अभूतपूर्व वाहतूककोंडी फोडण्यासाठी आतील रस्त्यावर तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग ते थेट वांद्रे स्थानक अशी बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवावी, अशी सूचना वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे.
२०१४ साली चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ती आजतागायत कायम आहे. लिंक रोड उतरल्यानंतर वाहतूक एकाच जागी एकवटते. शिवाय पश्चिम व पूर्व उपनगरातील वाहन चालक महामार्गाचा वापर न करता लिंक रोडचा वापर करू लागले आहेत. परिणामी अडचणीत भर पडली आहे.
बीकेसी जोडपुलामुळेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लिंक रोडने पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या बहुसंख्य वाहनांनी यापूर्वीच जोडपुलाचा पर्याय स्वीकारला आहे. या वाहनांसह अन्य वाहनेही याच पुलाचा वापर करू लागली आहेत. त्यामुळे कुटुंब न्यायालयापासून जोडपुलापर्यंत जाण्यासाठी किमान २० मिनिटांचा कालावधी लागतो. यापूर्वी हे अंतर पाच मिनिटांच्या आत पूर्ण करता येत होते. परंतु आता सर्व वाहतूक बँक ऑफ बडोदा व वन बीकेसीच्या रस्त्यावर एकवटली आहे.
ही कोंडी फोडण्यासाठी बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका आखावी, अशी सूचना वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी केली आहे. बसच्या अनेक फेऱ्यांमधून तासाला किमान आठ हजार प्रवाशांची वाहतूक गृहित धरल्यास खूप मोठा भार हलका होऊ शकतो. हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक बसचा पर्याय दिल्यास या भागातील कारने प्रवास करणारे कर्मचारी बसचा वापर करू शकतील, असा पर्याय त्यांनी सुचवला आहे. त्याशिवाय पूर्व द्रुतगती महामार्ग ते थेट वांद्रे पूर्व स्थानकापर्यंत एक मार्गिका बससाठी राखीव ठेवावी. त्यामुळे बस वेगाने पूर्व द्रुतगती महामार्ग ते वांद्रे स्थानकापर्यंत प्रवास करेल. साहजिकच महामार्गावरून बीकेसीत येणाऱ्या प्रवाशांना बसचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या बसचे भाडे कमी झाल्याने लोकांना हा पर्याय परवडू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच वाहतूक पोलिसांना सादर केला जाणार आहे. मुंबईतील वाहतूक प्रश्नांवर उपाय सुचवणाऱ्या मुंबई मोबॅलिटी फोरमचे दातार हे सदस्य आहेत.
पार्किंग हटवण्याचा पर्याय
बीकेसीत रस्त्यावर होणारी पार्किंग काढून टाकली तर आणखी एक मार्गिका वाहनांसाठी उपलब्ध होईल. सध्या बीकेसीतील प्रत्येक रस्त्यावर एक मार्गिका पार्किंगने अडवली आहे. या वाहनांसाठी बीकेसीत जास्त क्षमतेची पार्किंग स्थळे उभारली पाहिजेत. सध्या या स्थळांची संख्या खूपच कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.