म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दादरच्या चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करून अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेवून जाण्याचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी येथे केले.
चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आठवले बोलत होते. चैत्यभूमीचे सुशोभिकरण लवकरच केले जाईल. भव्य दिव्य असा स्तूप उभारला जाईल, इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवरील बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आठवले म्हणाले.
चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारून लाखो भीम अनुयायांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे डॉ. खाडे यांनी सांगितले. बाबासाहेबांचे विचार सर्वांना समजले पाहिजेत त्यासाठी ही भीमज्योत प्रेरणा देणारी आहे. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पुतळ्यासमोर भीमज्योत उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करील, असे खाडे यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले की, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मरणोत्तर उचित सन्मान राखला जात आहे. आपल्याबरोबर देशातील सर्व घटक यात सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. चैत्यभूमीचे सुशोभिकरण करण्याचे शासन स्तरावर प्रयत्न केले जातील.
यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा उर्फ सुधाकर सरवदे, खा. राहुल शेवाळे, आ. भाई गिरकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.