अ‍ॅपशहर

'इतकी खुमखुमी असेल तर 'त्या' प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ द्या'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर शेलक्या शब्दांत टीका केल्यामुळं नीतेश राणे संतापले आहेत. तुम्ही श्रावणबाळ जन्माला घातलाय का, असा सवाल नीतेश यांनी ठाकरेंना केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2020, 5:39 pm
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेमुळं आमदार नीतेश राणे चांगलेच संतापले आहेत. नीतेश यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर कडाडून टीका करतानाच पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray-Nitesh Rane


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा काल पार पडला. भाजपला धक्का देत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं शिवसेनेशी उभा दावा मांडला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेला सातत्यानं घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपवासी झालेले नारायण राणे व त्यांचे दोन्ही सुपुत्र देखील शिवसेनेवर व ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत होते. उद्धव ठाकरे या साऱ्यांचा समाचार कसा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेच्या सर्व विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले. नारायण राणे व त्यांच्या दोन सुपुत्रांवर शेलक्या शब्दांत टीका केली.

वाचा: अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात

नारायण राणेंना उद्धव ठाकरे यांनी बेडकाची उपमा दिली. 'गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करताहेत, असं म्हणत त्यांनी एक कथाच ऐकवली. 'बेडकीने बैल पाहिला ही गोष्ट आपण ऐकली असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाजच येईना. तो आता चिरका झालाय,' असा चिमटा ठाकरे यांनी काढला होता.

वाचा: होऊन जाऊ द्या एकदा... नीलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांच्या टीकेमुळं नीतेश राणे चांगलेच संतापले आहेत. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. 'दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट... मग तुम्ही काय दिनोच्या कुशीत नशा करून मुलींवर अत्याचार करणारा 'श्रावणबाळ' जन्माला घातला आहे का?
इतकी खुमखुमी आहे तर मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता दिशा सालियनच्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होऊ द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते,' असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही त्यांनी टीका केली आहे. 'बिहारी जनतेच्या आधीच पक्षप्रमुखानी लस घेतलेली दिसते. किती आव आणत होते. जास्तच हवा भरलेली होती, पण 'टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊन दया,' असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज