अ‍ॅपशहर

हा उद्धव ठाकरेंचा नवा महाराष्ट्र आहे; भाजप आमदाराचं ट्वीट

राज्यातील अनेक निर्बंध शिथील होऊनही मंदिरं अद्यापही बंद असल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2021, 1:46 pm
मुंबई: राज्यात करोना निर्बंध शिथील होत असताना आणि मुंबईत लोकल ट्रेनची दारंही खुली झाली असताना धार्मिक स्थळं मात्र बंदच आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षानं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी अत्यंत खोचक ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane Targets Uddhav Thackeray)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे


'महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो, तो डर के रहो... ये है उद्धव का नया महाराष्ट्र!!, असं ट्वीट नीतेश राणे यांनी केलं आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर निर्बंध शिथील होत असतानाही धार्मिक स्थळांबाबत राज्य सरकारनं लवकर निर्णय घेतला नव्हता. त्यावेळी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलन केलं होतं. महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करून दिली होती. मात्र, संसर्गाचं कारण देत राज्य सरकारनं त्यावर निर्णय घेणं टाळलं होतं. आता दुसरी लाट ओसरत असतानाही राज्य सरकारनं मंदिरं उघडण्याबाबत 'आस्ते कदम' धोरण स्वीकारलं आहे. पंढरीची पायी वारी करण्यावरून भाजप व सरकार आमनेसामने आले होते. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं पायी वारी करण्याचा हट्ट धरला होता. काही वारकऱ्यांचीही साथ त्यांना लाभली होती. मात्र, सरकार भूमिकेवर ठाम राहिले. आता लोकल व मॉल खुले झाल्यानंतर तरी सरकार मंदिर उघडण्यास परवानगी देईल, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरल्यानं भाजप संतापला आहे. कालच भाजपचे आमदार राम कदम यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखलं.

फडणवीसांची टीका, कदमांचे आंदोलन

देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल राज्य सरकारच्या या भूमिकेवर टीका केली होती. 'मंदिरं बंद ठेवण्यामागचं कारणंच लक्षात येत नाही. मॉल, दारूची दुकाने आणि बारमध्ये मंदिरांपेक्षा जास्त गर्दी होते तरीही दारूची दुकानं सुरू आणि मंदिरं बंद का?, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला होता. 'जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे?, सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आणखी वाचा:

रेल्वे प्रवासाबाबत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी

अधिवेशन आलं की सरकार करोना वाढवते; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज