म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सरकार स्थापन करण्याची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. असे असले तरी आमचेच सरकार येणार, असे सांगणारे राज्यातील भाजपचे नेते हे केंद्रीय नेतृत्व अखेरच्या टप्प्यात काही तरी जादूची कांडी फिरवेल, या आशेवर आहेत.
राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले असतानाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद या शिवसेनेच्या मागणीवरून सत्तास्थापनेचे घोडे अडले. राज्यातील नेत्यांच्या स्तरावर यातून मार्ग निघाला असता, पण सेनेची कोंडी करण्याच्या नादात ही संधी गमावली गेली. शिवसेनेसोबतचे संबंध खूप ताणले गेले. मात्र केंद्रीय नेतृत्वानेही यात हस्तक्षेप न केल्याने अशी अवघड स्थिती निर्माण झाली असल्याचे राज्यातील भाजपच्या नेत्यांचे मत आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास राज्यातील नेते अनुकूल आहेत. मात्र केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखविण्याची गरज आहे, असेही या नेत्यांनी सांगितले. राज्यात सत्ता आणण्यासाठी केंद्रीय नेतृत्वच जादू करू शकते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीतून भविष्यात काही नवी समीकरणे जन्म घेतील, असेही या नेत्यांना वाटत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळले नाही तर शिवसेसोबत पुन्हा सत्तेचे सूर जुळतील, या आशेवर सध्या भाजपचे राज्यातील नेतृत्व आहे. अन्यथा विरोधी बाकावर बसण्याचा पर्याय भाजपपुढे शिल्लक उरणार आहे.