म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या कामगार भरतीत कठीण प्रश्न विचारण्यात आल्याने भरती रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी भरती परीक्षेसाठी काढण्यात आलेली प्रश्नपत्रिका योग्यच असल्याचा दावा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे. परीक्षेला बसलेल्या सुमारे तीन लाख उमेदवारांपैकी एक लाख सहा हजार उमेदवार उत्तीर्ण झाल्याची माहिती देत मेहता यांनी अनेक उमेदवारांना मिळालेले गुणही सांगितले.
पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती परीक्षेमध्ये विचारलेल्या कठीण प्रश्नपत्रिकेवरून राजकीय पक्षांनी रान उठवले होते. भाजपचे आमदार विजय उर्फ भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा लावून धरत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. परीक्षेवरून झालेल्या वादानंतर पालिका आयुक्तांनी पालिका सभागृहात याबाबत माहिती दिली.
परीक्षेला एकूण दोन लाख ८७ हजार उमेदवार बसले होते. त्यापैकी एक लाख सहा हजार उमेदवार उत्तीर्ण झाले. परीक्षा पारदर्शक व्हावी तसेच हुशार उमेदवारांची निवड करता यावी म्हणून अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. परीक्षेसाठी लाखो अर्ज येत असतात. त्यातून निवडक उमेदवारांची निवड करता यावी, यासाठीच ही परीक्षा घेण्यात आली होती. यापूर्वी पालिकेने १३०० कामगारांच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यावेळेसही लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. त्या परीक्षेत सहा हजारांहून अधिक उमेदवारांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते. आधीच्या भरतीचा विचार करता अशा प्रकारे पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
३४ उमेदवारांना ९० टक्क्यांहून अधिक
या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या ३४ आहे. तर ८० ते ९० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांची संख्या सुमारे १५०० आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका कठीण असत्या तर इतके गुण मिळाले असते का, असा सवाल आयुक्तांनी केला आहे.