अ‍ॅपशहर

पुस्तक व्यवसायाला सवलतींचा आधार

पद्मगंधा प्रकाशनाकडून दर शनिवार ते सोमवारदरम्यान एका पुस्तकावर ५० टक्के सवलत, महिला दिनानिमित्त अक्षरधाराकडून लेखिकांच्या साहित्यावर सवलत, ग्रंथालीतील अनेक सवलत योजना... पुस्तक व्यवसायाला आधार मिळण्यासाठी अशाप्रकारच्या सवलत योजना महत्त्वाच्या ठरत आहेत. मात्र आता केवळ सवलतीवर अवलंबून राहता येणार नाही, तर पारंपरिक विक्रीपलीकडे जाऊन पुस्तकांचा विचार होत आहे.

Maharashtra Times 16 Mar 2018, 4:30 am
वाचकांना आकर्षित करण्यासाठी मात्र विविध उपाययोजना आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम book sellers are giving discount and concessions
पुस्तक व्यवसायाला सवलतींचा आधार


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पद्मगंधा प्रकाशनाकडून दर शनिवार ते सोमवारदरम्यान एका पुस्तकावर ५० टक्के सवलत, महिला दिनानिमित्त अक्षरधाराकडून लेखिकांच्या साहित्यावर सवलत, ग्रंथालीतील अनेक सवलत योजना... पुस्तक व्यवसायाला आधार मिळण्यासाठी अशाप्रकारच्या सवलत योजना महत्त्वाच्या ठरत आहेत. मात्र आता केवळ सवलतीवर अवलंबून राहता येणार नाही, तर पारंपरिक विक्रीपलीकडे जाऊन पुस्तकांचा विचार होत आहे.

पद्मगंधाने दर आठवड्याला शनिवार ते सोमवार या कालावधीमध्ये ५० टक्के सवलत योजना जारी केली आहे. दर आठवड्याला एक वेगळे पुस्तक या सवलतीत उपलब्ध होणार आहे. योजनेमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढतो का, याचे उत्तर मात्र १०० टक्के सकारात्मक मिळत नाही. काही पुस्तकांबाबत वाचक उत्साह दर्शवतात, मात्र काही पुस्तकांच्या प्रती सवलत मूल्यानेही तीन ते चारच्या वर विकल्या जात नाहीत, अशी माहिती पद्मगंधाचे अरुण जाखडे यांनी दिली. वाचकांना आकर्षित करून घेण्यासाठी पुस्तकाची किंमत निम्म्यावर आणल्यास इतर विक्रेते नाराज होतात. ही नाराजी पत्करूनही प्रकाशक सवलत योजना जाहीर करत आहेत. या निमित्ताने विस्मरणात गेलेली पुस्तके पुन्हा एकदा वाचकांसमोर येतात, हा दिलासा मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अक्षरधाराने महिला दिनानिमित्त काही लेखिकांची पुस्तके सवलत दरात उपलब्ध केली होती. यात दुर्गा भागवत यांच्या सर्व पुस्तकांचा संच अनेक वाचकांनी खरेदी केला, तर गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांच्या प्रती कमी पडल्या, अशी माहिती रमेश राठीवडेकर यांनी दिली. काही लेखकांबाबत सवलतीनंतर चांगला अनुभव घेतो. सवलतीमुळे वाचक वाढतात. मात्र केवळ सवलत या व्यवसायाला तगवू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या तसेच शाळांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शने आयोजित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

वाचकवर्ग टिकवण्यासाठी...

दुसरीकडे, वारंवार सवलत योजनेमुळे वाचकांची दिशाभूल होते, असे सांगत राजहंसतर्फे सवलतीची दुसरी बाजू उलगडून सांगण्यात आली. राजहंस प्रकाशनाने मराठी भाषा गौरव दिनापासून महाराष्ट्र दिनापर्यंत ६५ दिवस, ६५ पुस्तके ३० टक्के सवलतीत देण्याची योजना आखली आहे. मात्र सवलतीमुळे पुस्तकांची मूळ किंमत हीच असणार, असा वाचकांचा गैरसमज होतो आणि कायमच सवलतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. पुस्तकांची दुकाने बंद होण्याच्या सध्याच्या काळात सवलत योजना हा वाचकांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा मार्ग ठरत आहे. सोशल मीडियामधून सवलती वाचकांपर्यंत पोहोचल्या की, पुस्तकांबद्दल विचारणा होते, त्यामुळे वाचकवर्ग टिकायला मदत होते, असा अनुभव राजहंसच्या विनायक पणशीकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'कडे व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज