म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारबद्दल जनतेत रोष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचा हा रोष मतदानात दिसेल आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन यांचा पदग्रहण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी पार पडला.
प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर थोरात म्हणाले की, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी अनेक कर्तृत्ववान नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. मलाही ती संधी पक्ष नेतृत्वाने दिली आहे. गेल्या चार वर्षांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, व्यापारी, सगळेच संकटात आहेत. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. काँग्रेस सरकारच्या काळातील निकष या सरकारने बदलल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. शेतीमालाला भाव नाही. कृषिक्षेत्र अडचणीत आल्यामुळे इतरही सर्व क्षेत्रात मंदी आली आहे. यास या सरकारची धोरणे जबाबदार आहेत.
मुंबईसह राज्यातील विविध दुर्घटनांमध्ये किड्यामुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. भाजप-शिवसेना सरकार खोट्या जाहिरातीद्वारे लोकांची फसवणूक करत आहे. या सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश आम्ही करू, असे थोरात म्हणाले.
सरकारविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. समाजातला एकही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी टीम असून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडू आणि १९८० च्या विजयाची पुनरावृत्ती करू, असेही ते म्हणाले. काँग्रेस विचार शाश्वत असून, सर्वसामान्यांच्या अंत:करणात काँग्रेस पक्ष आहे. तळागाळातल्या या लोकांपर्यंत पोहोचू. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात, त्यामुळे विधानसभेला लोकसभेपेक्षा वेगळा निकाल येईल, असे ते म्हणाले. काही संधिसाधू लोक पक्ष सोडून गेल्याने आता पक्षात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी आहे.
काँग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या बाता मारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना स्वतःचे काय होणार ते माहीत नाही? त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेचा निकराने प्रतिकार करू, असे त्यांनी सांगितले.
मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष थोरात यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की गेली चार वर्षे जनतेच्या प्रश्नावर संघर्ष केला. जनसंघर्ष यात्रा काढली, विधानभवनावर मोर्चे काढले, जनआक्रोश मेळावे घेतले. सर्वांच्या सहकार्याने पक्ष वाढविण्यासाठी काम केले. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्यानंतरही आपण दोन महिने काम केले. आता पक्षनेतृत्ववाने बाळासाहेब थोरातांकडे नेतृत्व दिले आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करू.
तत्पूर्वी सकाळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.