म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'परीक्षा विभाग विकणे आहे', असा नारा देत महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या (मसला) वतीने बुधवारी दुपारी मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी १० दिवसांत परीक्षेचा निकाल लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात केले आहे.
एलएलबी, एलएलएमचे निकाल तात्काळ जाहीर करावेत, मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर १० दिवसांत पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावे, सर्वच सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन विद्यापीठ स्तरावर ऑफलाइन करावे, विद्यार्थ्यांना तात्काळ बॅचलर ऑफ जनरल डिग्रीचे प्रमाणपत्र द्यावे, एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका उपलब्ध कराव्यात, तसेच विधी (लॉ) शाखेचा निकाल तातडीने लावावा आदी मागण्यांसाठी 'मसला'तर्फे बुधवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनसमोर दुपारी साडेबारा वाजता 'परीक्षा भवन विकणे आहे' असा नारा देत जोरदार आंदोलन केले. यानंतर संचालक पाटील, उपकुलसचिव विनोद माळाळे, कृष्णा पराड यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.