आधी केलेचि पाहिजे।
- अनिरुद्ध पंडित, कुलगुरू, रसायनशास्त्र संस्था
...
गुण - १० पैकी ७
शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी ही गेल्या अनेक वर्षांची मागणी यंदा काही प्रमाणात पूर्ण झाली असे म्हणता येईल. यंदा शिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा नक्कीच विज्ञान संशोधनाला होणार आहे. यंदा अर्थसंकल्प मांडताना केवळ नवीन संस्थांची घोषणा केली गेली नाही, तर आहे त्या संस्थांना बळकटी देण्यासह तरुण कुशल होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे हे विशेष.
अर्थसंकल्पात देशात न्यायवैद्यकशास्त्र व पोलिस विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. या दोन विद्यापीठांमुळे आंतरविद्याशाखा शिक्षणाला चालना मिळणार आहे. गुन्ह्याची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या विद्यापीठांच्या माध्यमातून शिकवली जातील. हे करत असताना विज्ञान संशोधनाला विशेष चालना मिळून या क्षेत्रातील संशोधनाची नवी कवाडे खुली होणार आहेत. याचबरोबर सरकारने काळानुरूप आवश्यक अशा शिक्षण पर्यायावर विचार केल्याचे दिसून आले आहे.
यंदा कौशल्य शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे देशातील तरुणांना कुशल करण्यासाठीचे मोठे पाऊल असणार आहे. याशिवाय एका वेगळ्या आणि आधुनिक क्षेत्राचा सरकारने विचार केला आहे तो म्हणजे कॉण्टम टेक्नॉलॉजी. यासाठी स्वतंत्र आठ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. यामुळे या क्षेत्रातील संशोधनाला विशेष चालना मिळणार आहे. आज आपल्याकडे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. आपण युरो ४.०वरून युरो ५.०वर न जाता थेट युरो ६.०वर गेलो. पण आपण सॉफ्टवेअरपुरतेच मर्यादित राहिलो. मात्र त्यासाठीचे हार्डवेअर उपलब्ध होणे आवश्यक असते. यासाठी या क्षेत्रातील संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. त्याकरिता या क्षेत्रातील तरतूद महत्त्वाची मानली जाऊ शकते. यामुळे या क्षेत्रात संशोधनाला मोठा फायदा होऊन तरुणांना संशोधनासाठी शिवाय रोजगारासाठी नवे दालनही खुले होणार आहे. या क्षेत्रात आज खूप कमी देश काम करत आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर देशात या क्षेत्रात योगदान देणारा आपला देश तिसरा ठरणार आहे. यामुळे या क्षेत्रातील तरतूद ही यंदाच्या अर्थसंकल्पातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणार आहे. येत्या काळात या क्षेत्रात उत्तमप्रकारे काम होईल अशी अपेक्षा करता येईल.
यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी एक विशेष बाब म्हणजे देशातील १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणास देण्यात आलेली. यामुळे देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील शिक्षण इच्छुक विद्यार्थ्याला घेणे शक्य होणार आहे. याचा फायदा विज्ञान शिक्षणासाठीही होऊ शकणार आहेत. तसेच उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांना इटर्नशिप्स देणे बंधनकारक राहणार आहे. याचा फायदा तरुण विद्यार्थ्यांना होणार असून त्यांना कामाच्या ठिकाणचा प्रत्यक्ष अनुभव तर मिळेलच; शिवाय त्यांच्यातील कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. सर्व क्षेत्रांबरोबरच विज्ञान क्षेत्रासाठी हे मोठ्या प्रमाणावर लाभदायी ठरेल.
अर्थसंकल्पात शिक्षणसाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे देशात विज्ञान क्षेत्राला सध्या भासत असलेली निधीची तरतूद भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र प्रत्यक्षात कोणत्या क्षेत्राला किती निधी उपलब्ध झाला आहे, ही बाब समोर आल्यावरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल. एकूण यंदाचा अर्थसंकल्प विज्ञान तंत्रज्ञानासाठी कागदावर समाधानकारक दिसत असला तरी त्याची 'केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।'नुसार अंमलबजावणी कशी होते, यावर सर्व काही अवलंबून आहे. ती योग्यप्रकारे होईल ही अपेक्षा!