नवीन पनवेल सेंट जोसेफ शाळेतील मारहाण प्रकरण
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी शाळेतील आठ वर्गशिक्षिका आणि एका पर्यवेक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खांदेश्वर पोलिस ठाण्यात नव्याने अहवाल सादर केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी दिलेल्या जबानीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी मारहाण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दहा दिवसांपूर्वी शाळेत दोन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. हातापायाला दुखापत होईपर्यंत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिकाही न्यायालयाला शरण आल्या. दरम्यान, पालकांनी शाळेत घडलेल्या मागील घटनांचा संदर्भ देत शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालात बदल का, असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांशी बोलून पुन्हा नव्याने अहवाल तयार करून खांदेश्वर पोलिस ठाण्यात सादर केला.
त्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांच्या जबानीनुसार शाळेतील आठ वर्गशिक्षिकांवर विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाला तत्कालीन पर्यवेक्षिकाही जबाबदार असल्याचे म्हटले असून त्यानुसार हा गुन्हा दाखल केल्याची माहिती खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश मोरे यांनी दिली. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे, वर्गात एकट्या विद्यार्थिनीला कोंडून ठेवणे यांसारखे प्रकार या वर्गशिक्षिकांनी केल्याची विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
…………
चार महिन्यांपूर्वी बाल संरक्षक कक्षाने चुकीचा अहवाल दिला नसता, तर हा गुन्हा यापूर्वीच दाखल झाला असता. घटना ताजी असताना मुलांनी दिलेली माहिती आणि चार महिन्यानंतर पुन्हा तेच सांगणे यात निश्चितच फरक पडला असणार. तरीही शाळेत असे प्रकार घडत असल्याचे सिद्ध झाले. मुजोर प्रशासन आता तरी नमेल, अशी आशा आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या लढ्यात आम्हाला मोलाचे सहकार्य केले.
महेंद्र पवार, पालक
……
सतत वादात
मागील दोन वर्षांपासून नवीन पनवेल सेक्टर७ येथील सेंट जोसेफ शाळेचे प्रशासन व पालक यांच्यात विविध कारणांवरून सातत्याने वाद होत आहेत. शाळेने पालकांना विचार न घेता, कॅपिटेशन अॅक्टचे उल्लंघन करून प्रचंड फीवाढ केल्याने वाद निर्माण झाला होता. काही पालकांनी ही फी न भरण्याचा निर्णय घेतला. पालकांनी संघटीत होऊन आंदोलन करत, स्थानिक शिक्षण प्रशासन, जिल्हा शिक्षणाधिकारी, राज्याचे शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणमंत्र्यांपर्यंतही धाव घेतली होती.