म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णांनाही खासगी रुग्णालयांच्या आडमुठेपणाचा अनुभव घ्यावा लागतो, विमा कंपन्या आणि रुग्णालयांमध्ये परस्परसमन्वय असेल, तर त्यामध्ये रुग्णाची परवड होत नाही, अशी खंत मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय रुग्णाने व्यक्त केली आहे.
२९ एप्रिल रोजी करोनाचा संसर्गाचे निदान झाल्यानंतर हा रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येथे दाखल झाला. त्यावेळी त्याच्याकडून ५० हजार रुपये अमानत रक्कम घेण्यात आली. या रुगणाकडे खासगी विमा कंपनीचा कॅशलेस विमा उतरवलेला होता. ४ मेपर्यंत त्याचे बिल एक लाख ३७ हजार ९४६ रुपये इतके झाले. या रकमेपैकी विमा कंपनीने ७० हजार ६८७ रुपये संमत झाले. तर ६७ हजार २५९ रुपये नाकारण्यात आले. रुग्णाच्या म्हणण्याप्रमाणे रुग्णालयाकडे एक लाख २० हजार रुपये ६८७ रुपये जमा झाले. यातील १७ हजार २५९ इतके पैसे भरणे बाकी होते. मात्र, त्यावेळी ५० हजार रुपये भरण्यास रुग्णालयाने भाग पाडले, असा आक्षेप या रुग्णाने केला आहे. त्यासाठी दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत पैशांची तजवीज होईपर्यंत तिथेच बसवून ठेवले. कॅशलेश सुविधा असून रुग्णालयाने एक लाख रुपये (ऱोख) का घेतले, असा प्रश्न या रुग्णाने उपस्थित केला आहे. हे पैसे रिफंड होऊन ३५ ते ४५ दिवसांमध्ये परत मिळतील, असे सांगण्यात आले. त्या दिवशी आठ वाजता डिस्चार्ज घेऊन घरी गेलेल्या या रुग्णाला रात्री बारा वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने परत आले, त्याने त्याच्याकडून ५० हजार रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेतले. त्यावेळी रुग्णालयाने विमा कंपनीकडून या रुग्णाचे बिल (प्रोव्हिजनल) एक लाख ३० हजार होऊ शकते, असे संमत करून घेतले. ५ मे रोजी दुसऱ्यांदा दाखल करून घेण्यासाठी पुन्हा ५० हजार रुपये अमानत रक्कम घेतली. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये दोन्ही वेळची मिळून दीड लाख रुपयांच्या रोख रकमेची उपलब्धता करून देण्यात अडचणी या रुग्णापुढे होत्या. आजही हा रुग्ण येथे वैद्यकीय उपचार घेत आहे, त्याला मागील काही दिवसांपासून सतत शौचास होत आहे. त्यासंदर्भात वांरवांर सांगूनही व्यवस्थित उपचार दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
'शिल्लक रक्कम परत दिली जाते'
यासंदर्भात रुग्णालयाकडे विचारणा केली असता, रुग्णाने यासंदर्भात कल्पना दिली नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच रुग्णाला व त्याच्या काळजीवाहू व्यक्तीला बिलाची कल्पना देण्यात येते, तशी पूर्वकल्पना या रुग्णालाही देण्यात आली होती. विमा कंपनीच्या अंतर्गत रुग्णाला विमा कवच देण्यात येते. त्यातील काही रक्कम समायोजित करण्यासाठी राखीव ठेवली जाते. सर्व शिल्लक रक्कम एका निश्चित कालावधीमध्ये रुग्णाला परत देण्यात येते, असे स्पष्टीकरण दिले.