विद्यापीठ परीक्षा विभागाचा घोळ सुरूच
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सुरू असलेला गोंधळाचा सिलसिला मंगळवारी कायम राहिला आहे. हवामानशास्त्र विषयाचा पेपर अनेक परीक्षा केंद्रावर वेगवेगळा देण्यात आल्याचा आरोप मंगळवारी विद्यार्थी आणि परीक्षा केंद्राकडून करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र यात आपली कोणतीही चूक नसून परीक्षा केंद्रावर चुकीचा पेपर डाऊनलोड करण्यात आल्याचे स्पष्ट करीत याप्रकरणी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मास्टर इन भूगोल अभ्यासक्रमातील ‘हवामानशास्त्र’विषयाचा पेपर सोमवारी होता. यावेळी पालघर, दादर, वांद्रे येथील काही परीक्षा केंद्रावर जुन्या अभ्यासक्रमावर आधारित, तर घाटकोपरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ही विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. याबाबत काही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी परीक्षा विभागाशी संपर्क साधून हा प्रकार लक्षात आणून दिला. यावर परीक्षा विभागाने मात्र संबंधित परीक्षा केंद्रावर चुकीची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत परीक्षा केंद्रावर टीका करताना चुकीचा पेपर डाऊनलोड केल्याने ही घटना घडल्याचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले. तर परीक्षा केंद्रांनी विद्यार्थ्यांना योग्य पेपर देण्यासाठी डाऊनलोड करताना खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी यावेळी नमूद केले. तर या विद्यार्थ्यांबाबत बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही खान यांनी यावेळी सांगितले.
प्राध्यापकांच्या बैठकीत ही गोंधळ
टीवायबीकॉमच्या उत्तरपत्रिकेवरील बदलांसंदर्भात बोलविण्यात आलेल्या बैठकीत ही गोंधळ उडाला होता. कलिना कॅम्पस येथे आयोजित या बैठकीत तब्बल ६०० प्राध्यापकांना मनस्ताप सहन करावा लागला. या बैठकीत शिक्षकाला मॉडेल उत्तरपत्रिका मिळणे अपेक्षित होते. परंतु, फोटोकॉपी करण्यास विद्यापीठ विसरल्याने उत्तरपत्रिकेवरील चर्चेविना प्राध्यापकांना हात हलवत परतावे लागल्याने अनेकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ई कॉपी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. मात्र मंगळवार दुपारपर्यंत ही ई कॉपी देण्यात आली नसल्याचे यावेळी प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.
प्रभारी परीक्षा नियंत्रकांची पदमुक्तीची मागणी
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रभारी परीक्षा नियत्रंक पदी कार्यरत असलेल्या दीपक वसावे यांनी परीक्षा नियत्रंक पदापासून पदमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची खात्रीदायक माहिती हाती आली आहे. प्रशासनाने मात्र त्यांची मागणी फेटाळली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.