स्वच्छता मोहिमांचा रौप्यमहोत्सव
पृथ्वीरक्षक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सह्याद्रीचे वैभव अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये या कड्यांवर प्रेम करणारे, त्यांच्यावर चढाई करत नवनवे विक्रम करणारे अनेक ट्रेकर असतात. मात्र या सह्याद्रीची काळजी घेणारे खरे दुर्गभक्त कमी असतात. मुंबई आणि पुण्यातील सह्यवेड्यांचा 'द ट्रॅश टॉक' हा ग्रुप सह्याद्रीच्या स्वच्छतेचा वसा जपत आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांची २५वी स्वच्छता मोहीम पार पडली.
'द ट्रॅश टॉक' ग्रुपने गड-किल्ले स्वच्छतेचे काम अडीच वर्षांपासून सुरू केले. महिन्यातून एका रविवारी गडावर जाऊन गडावरील कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती या गटाचे प्रमुख केदार पाटणकर यांनी दिली. त्यांचे बालपण सायन परिसरात गेले आहे. यातूनच सायन किल्ल्याशी नाते जुळले आणि दुर्गभ्रमंतीची आवड त्यांच्यामध्ये रुजली. त्यामुळे २० वर्षे अमेरिकेत राहून त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी पुन्हा दुर्गभ्रमंतीला सुरुवात केली. या दुर्गभ्रमंतीसोबतच त्यांनी गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचा निश्चय केला. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये इंजीनिअर, डॉक्टर, सिनेक्षेत्रतील काही मंडळी यांचा समावेश आहे. वृषाली पाटणकर, रवी कान्हेरे, मीता कान्हेरे, किरण यज्ञोपवीत, हर्षद वेलणकर, सुनील जोशी, मुग्धा जोशी, प्रसन्न भारद्वाज, प्राजक्ता भारद्वाज, आशीष सप्रे, मकरंद घोलबा, रोहन पाटणकर, सोनिया कान्हेरे, सिद्धार्थ जोशी, सोनाली फडणीस या मंडळींनी तोरणा, राजगड, विजयदुर्ग, पुरंदर, रोहिडा, प्रतापगड, लोहगड, तिकोना, रायरेश्वर, राजगड, सिंहगड अशा अनेक गडांवर मोहिमा हाती घेऊन स्वच्छतेचे काम केले. दर वेळी गडावर गेल्यावर प्रामुख्याने प्लास्टिकचा कचरा दिसतो, असे पाटणकर यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये त्यांनी विसापूर स्वच्छतेची मोहीम पार पाडली.
केवळ व्यवस्थेला नावे ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणे गरजेचे आहे, या जाणीवेतून या मंडळींनी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. गडावरील इतर पर्यटकही या मोहिमांमध्ये स्वखुशीने सहभागी होतात. लहान मुलांना हे मुद्दाम दाखवतात. अनेक लोक गडावर कचरा न टाकण्याची शपथ घेतात. त्यांनी काढलेल्या फोटोंमधून हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचतो आणि समाजप्रबोधन होते. फारसा गाजावाजा न करता स्वच्छतेचा वसा सांभाळणाऱ्या या पृथ्वीरक्षकांनी इतरांसमोरही पायंडा घालून दिला आहे.
.........
प्रत्येक मोहिमेत २० किलो कचरा
प्लास्टिक आणि रॅपरसारख्या अनेक गोष्टींचे विघटन होत नाही. हा कचरा गडांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. यामध्ये दारूच्या बाटल्यांचाही समावेश असतो. हा कचरा गोळा करून तो पुण्यातील रुद्र फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येतो. ही संस्था त्यांचे इंधनामध्ये रूपांतर करते. प्रत्येक मोहिमेत किमान १५ ते २० किलो कचरा गोळा होतो.