म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री आणि खासदारसुद्धा असतील, अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत दिली. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शरयू नदीच्या तीरावर आरतीसुद्धा करणार आहेत, असे राऊत यांनी ट्वीट करून स्पष्ट केले आहे.
यापूर्वीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा रामजन्मभूमी प्रकरणी निवाडा आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या १०० दिवसांच्या पूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे याआधी जाहीर करण्यात आले होते. आता त्या दौऱ्यासाठी ७ मार्च ही तारीख निश्चित झाली आहे. या अयोध्या दौऱ्याच्या वेळी देशभरातून हजारो शिवसैनिक येणार आहेत, असेही राऊत म्हणाले.
अयोध्येला जाताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांनी जावे अशा आशयाची टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. त्या निकालाचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी स्वागतच केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनादेखील अयोध्येला सोबत येण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत. अयोध्या यात्रा हा काही राजकीय प्रश्न नाही. जशी पंढरपूरची वारी असते तशीच ही वारी आहे, असे राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल विचारता संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. शिवसेना आपल्या विचारांवर ठाम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशात प्रखर राष्ट्रवादाचा विचार रूजविला आहे. आता काही लोकांना नवीन पालवी फुटत असेल तर फुटू दे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना याचे लोकांना रोज स्मरण होते. हिंदुत्वाच्या विषयावर शिवसेनेला कोणी आव्हान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.