अ‍ॅपशहर

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं रामजन्मभूमी ट्रस्टला पत्र, पत्रास कारण की...

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर आला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला एक पत्र लिहिलं आहे. (Uddhav Thackeray writest to Ram Mandir Trust)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2020, 10:01 pm
मुंबई: अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवार, ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भूमिपूजनला जाणार का, याबाबत अधिकृत काहीच सांगितले गेले नसले तरी उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला एक पत्र लिहिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम उद्धव ठाकरेंचं रामजन्मभूमी ट्रस्टला पत्र


वाचा: 'राम मंदिराबाबत पवारांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रीयदृष्ट्या पाप'

ट्रस्टच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जगातील कोट्यवधी हिंदू भूमिपूजनाच्या या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करत होते, असं त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे. तसंच, रामजन्मभूमीसाठी झालेल्या लढ्याच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार हजारो शिवसैनिकांनी अयोध्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. माझी स्वत:ची श्रीरामावर अपार श्रद्धा आहे,' अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत.

वाचा: प्रभू रामचंद्रांची मूर्ती मिशा असलेली असावी- संभाजी भिडे

संत तुलसीदास यांचा एक दोहा उद्धृत करून उद्धव ठाकरे पत्रात पुढे म्हणतात, 'माझ्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं १ कोटी रुपयांची देणगी देण्याचा संकल्प मी केला होता. ही रक्कम श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खाते क्र. ३९१६१४९५८०८ (स्टेट बँक ऑफ इंडिया, अयोध्या २५१० शाखा) येथे २७ जुलै २०२० रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून जमा केली आहे.'

उद्धव ठाकरे जाणार नाहीत?

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रण दिले गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, उद्धव ठाकरे हे भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. 'राम मंदिराच्या प्रश्नात आता राजकारण आणण्याची गरज नाही. आता होणारं भूमिपूजन हे मुहूर्तावर होत आहे. पण राज्यात आणि देशातही सध्या वैद्यकीय आणीबाणी आहे. अयोध्येतही करोनाचा कहर आहे. पुजाऱ्यांसह अनेकांना करोना झाला आहे. लालकृष्ण आडवाणी व उमा भारती हे नेतेही भूमिपूजनाला येणार नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे हे नंतर जाऊन पूजा करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

वाचा: अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं तोडीस तोड प्रत्युत्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज