संग्रहित फोटो घेता येतील
किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी
सर्वात मोठ्या समुद्री कवायती सुरू
- १३ युद्धनौकांसह एकूण १०० बोटींचा सहभाग, विमाने-हेलिकॉप्टरचा अरबी समुद्रात थरार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
किनारपट्टी १०० टक्के सुरक्षित असल्याची ग्वाही देणाऱ्या सर्वात मोठ्या समुद्री कवायती मंगळवारी देशाला लाभलेल्या प्रत्येक समुद्रात सुरू झाल्या. गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंत १३ राज्यांशी संबंधित समुद्रात एकाचवेळी या कवायती सुरू झाल्या आहेत. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमानअंतर्गत १३ अत्याधुनिक युद्धनौकांसह एकूण १०० बोटी, विमाने व हेलिकॉप्टर यांचा अरबी समुद्रात थरार सुरू आहे. बुधवारी रात्री या कवायती संपतील.
२६/११ च्या हल्ल्याची नुकतीच दशकपूर्ती झाली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी समुद्रातून घुसखोरी केली होती. त्यामुळेच देशाच्या ताब्यात असलेल्या समुद्रात वर्चस्व राखत समुद्र व पर्यायाने किनारपट्टी १०० टक्के सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नौदलावर सोपविण्यात आली. याच जबाबदारींतर्गत नौदलाकडून दर सहा महिन्यांनी संबंधित तळाच्या परिसरात तेथील तटरक्षक दल व राज्य सरकारांच्या सागरी पोलीसांच्या सहभागाने सुरक्षेसंबंधीच्या कवायती घेतल्या जातात. पण यंदा पहिल्यांदाच या कवायती एकाचवेळी सर्वत्र सुरू झाल्या आहेत.
सूत्रांनुसार, पश्चिम कमानअंतर्गत नौदलाच्या १३ व तटरक्षक दलाच्या ११ युद्धनौका तसेच अन्य बोटी यात सहभागी झाल्या आहेत. समुद्री चाच्यांना पकडण्यासाठी शीघ्र हल्ला करणाऱ्या छोट्या बोटी, घुसखोरी रोखणाऱ्या इंटरसेप्टर बोटी, नौदल व तटरक्षक दलाची १६ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यामध्ये सहभागी झाले आहेत. सागरी किनारपट्टीची सुरक्षा, हेच या कवयतींचे मुख्य लक्ष्य आहे. त्यामुळे या सुरक्षेचा संबंध असलेले राज्य सरकारचे सागरी पोलीस, सीआयएसएफ, बीएसएफ, सीमा शुल्क विभाग हेदेखील आपापल्या बोटींसह या कवायतींमध्ये सहभागी झाले आहेत.
--------------
३६ तासांचा अखंड थरार
मंगळवारी सकाळी ८ वाजता या कवायती सुरू झाल्या. बुधवारी रात्री ८ वाजता त्याची सांगता होणार आहे. यारम्यान समुद्रातून किनारपट्टीवर हल्ला होणे, समुद्री घुसखोरी, समुद्री चाच्यांकडून बोटीचे अपहरण होणे आदी प्रसंग उभे केले जात आहेत. या प्रसंगांना प्रत्येक संबंधित सुरक्षा एजन्सीजचा प्रतिसाद नेमका कसा असेल, याची चाचपणी व त्यानुसार उपाययोजना निश्चित केल्या जातील. देशाला लाभलेल्या ७५१७ किमी लांबीच्या किनारपट्टीपासून ५ नॉटीकल माइल अंतरावर या कवायती सुरू असून ३६ तासांचा अखंड थरार समुद्रात सुरू आहे.