म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनाविरोधातील लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलिस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट आदींच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला असून, या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नावे पत्र लिहून केले आहे.
गुढीपाडवा, नववर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतानाच, 'करोना विषाणूची धग महाराष्ट्रातही येऊन पोहोचली आहे. तुमची माझी चिंता वाढविणाऱ्या बातम्या सतत कानावर येत आहेत. महाविकास सरकारने पहिल्या दिवसापासून हे संकट गांभीर्याने घेतले आहेत. शासकीय सेवेतील विविध विभागांतील कर्मचारी आणि अधिकारी या लढाईत सामील असलेले असंख्य हात किंबहुना आपण या लढाईतील खरेखुरे सैनिक आहात', असे थोरात यांनी पत्रात नमूद केले आहे.
'सण-उत्सवांचा, कौटुंबिक सोहळ्याचा आणि आपल्या व्यक्तिगत सुटीचा विचार न करता महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आपण जोखीम पत्करून काम करत आहात. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धीराने सामोरे जातात. धोका पत्करून जनतेच्या पाठीशी उभे राहतात. ही शासनव्यवस्था तुमच्यामुळेच आहे. मला ठाऊक आहे आपलेही कुटुंब काळजीत आहे. मात्र, तरीही ही लढाई लढावीच लागणार आहे. आपल्याशिवाय हे युद्ध जिंकणे शक्य नाही. इतरांच्या आरोग्याची काळजी करताना आपण स्वतःलाही जपावे. मास्कचा वापर करावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा उपयोग करावा, बैठका-मदतकार्य करताना तीन फूट अंतर ठेवावे, स्पर्श टाळावा आणि इतरही आवश्यक असलेली काळजी घ्यावी', असे आवाहन त्यांनी केले.
'आरोग्य, पोलिस आणि महसूल विभागांसह सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी गेली आठ दिवस करोनाविरोधातील लढाईत व्यग्र आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि त्यांची टीम, विभागीय आयुक्त दररोज उशिरापर्यंत मैदानात आहेत. या अनपेक्षित लढाईला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व त्यांचे सर्व सहकारी हे १८ तास व्यस्त आहेत. तलाठी समाजाला धीर देतो. कोतवाल त्यांना मदत करत आहेत. तुम्ही घरदार सोडून राज्यासाठी दिवसरात्र एक करून काम करत आहात, त्याचे कौतुक आहे', असेही थोरात यांनी पत्रात नमूद केले आहे.