अ‍ॅपशहर

काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून येत्या बुधवारी २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 30 Sep 2019, 9:06 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress-ncp-alliance

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून येत्या बुधवारी २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या रविवारी मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक रविवारी दुपारी झाली. त्यात आघाडीतील लहान मोठ्या घटक पक्षांना सोडण्यात यावयाच्या तसेच दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघाच्या अदलाबदलीवर बरीच चर्चा करण्यात येऊन अंतिम तोडगा दृष्टीपथात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना प्रत्येकी १२५ जागा मिळणार आहे. तर आघाडीतील ११ मित्रपक्षांना ३८ जागा देण्याचा निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले.

सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीबाबत संभ्रम असल्यामुळे काँग्रेस आघाडीनेसुद्धा डावपेचाचा भाग म्हणून लगेच आघाडीतील जागावाटपाचा तोडगा जाहीर करण्याची घाई करू नये, असे यावेळी ठरले. दोन्ही काँग्रेसमधील अनेक मतदारसंघात अदलाबदल करण्याच्या प्रश्नावर मतैक्य न झाल्यामुळे उद्या सोमवारी पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या निवडक नेत्यांची बैठक होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन स्वाभिमानी, समाजवादी पार्टी, महाराष्ट्रवादी बहुजन वंचित आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि लोकभारती असे ११ पक्षसंघटना आहेत.

येत्या बुधवारी २ ऑक्टोबर रोजी मंत्रालय परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करुन, याच भागातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आघाडीतील १३ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात विधानसभेसाठीच्या महाआघाडीची घोषणा करण्यात येणार आहे, असे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने ५६ लहान मोठ्या पक्ष संघटनांना एकत्र करत महाआघाडीची मोट बांधली होती. धर्मनिरपेक्ष भूमिका असणाऱ्या छोट्या पक्षांचा दोन्ही काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा उठविता आला नव्हता.

आघाडीच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात हे उद्या सोमवारी सकाळी १० वाजता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसतर्फे येथे देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज