म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात प्रदेश काँग्रेसने लोकसभेच्या जागा आणि संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी सुरू केली असून, याबाबत पक्षाच्या नेत्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात नांदेड आणि हिंगोली या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे या दोन जागांबरोबर राज्यातील इतर जागांबाबतचा आढावा घेतला जात आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते या कोअर कमिटीत आहेत. कोकणाततील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेसपुढे प्रश्न आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढून भाजपसोबत आघाडी केल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहे.
मुंबईत निरुपम यांनी या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत सहभाग घेतलेला नाही. मुंबईतील सहा जागांचा आढावा मुंबई काँग्रेस घेईल, असे त्यांचे धोरण आहे. यापूर्वी मुंबईतील सहा जागांचा आढावा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होत असे. पण निरुपम यांनी वेगळे धोरण स्वीकारले आहे. याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश येथील जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. कोणते उमेदवार बदलावे लागतील याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून घेतली गेली आहे. इच्छुकांची यादी तयार आहे. त्यावर चर्चा करून प्रत्येक मतदारसंघातील तीन इच्छुकांची नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठविली जाणार आहे.