गिरगाव, काळबादेवीतील मेट्रो-३मुळे बाधित होणाऱ्यांना दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या गिरगाव व काळबादेवीतील रहिवाशांसाठी नव्या वर्षात खूशखबर आहे. प्रकल्पबाधितांसाठी उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामाला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे, तर आणखी एका इमारतीचे बांधकाम २०२०च्या सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी गिरगाव व काळबादेवीतील काही जुन्या चाळी पाडण्यात आल्या आहेत. त्यातील कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. काही जणांचे जवळच्या म्हाडा वसाहतीत पुनर्वसन करण्यात आले आहे. काहींनी अन्यत्र आपली सोय केली. त्यासाठी त्यांना रोख भाडे देण्यात आले. प्रकल्पाच्या आड येणारी या भागातील शेवटची चाळ चार महिन्यांपूर्वी पाडण्यात आली.
प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी गिरगाव, काळबादेवीतील प्रकल्पबाधितांचा प्रश्न गाजला होता. सुरुवातीला स्थानिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला होता. अनेक राजकीय पक्षांनीही प्रकल्पबाधितांची बाजू घेतली होती. स्थानिकांसह राजकीय पक्षांनी उग्र आंदोलने केली होती. त्यामुळे या भागात प्रकल्प रेंगाळला. अखेर तत्कालीन राज्य सरकारला वादात मध्यस्थी करावी लागली. राज्य सरकारकडून प्रकल्पबाधितांसाठी आकर्षक पॅकेज तयार करण्यात आले. वास्तविक पाहता, एखाद्या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या प्रकल्पबाधितांसाठी २५० चौ. फुटाचे घर देण्यात येते. मात्र गिरगाव व काळबादेवी येथील प्रकल्पग्रस्तांसाठी दुप्पट आकाराची घरे देण्याची योजना तयार करण्यात आली. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी जिथे चाळी होत्या, त्याच ठिकाणी नव्या इमारती बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर प्रकल्पबाधितांचा विरोध मावळला.
राहत्या ठिकाणीच पुनर्वसन
अलिकडच्या काळात या भागात मेट्रो-३ चे काम जोरात सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी जानेवारीपासून नव्या इमारतींची उभारणी होणार आहे. काळबादेवी, गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन होणार असून के-३ या पहिल्या पुनर्विकसित इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट जानेवारी २०२०मध्ये, तर जी३ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मे २०२० मध्ये देण्यात येणार आहे.