अ‍ॅपशहर

करोना लक्षणांच्या नोंदणीमुळे डॉक्टर-रुग्णांमध्ये वाद

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेतंर्गत मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय माहितीचे संकलन योग्य प्रकारे केले जात असले तरीही राज्याच्या ग्रामीण भागामधील चित्र वेगळे आहे.

महाराष्ट्र टाइम्स 5 Nov 2020, 11:53 am
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेतंर्गत मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय माहितीचे संकलन योग्य प्रकारे केले जात असले तरीही राज्याच्या ग्रामीण भागामधील चित्र वेगळे आहे. अनेक ठिकाणी ही मोहीम राबवण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे माहिती व्यवस्थित नोंदवली जात नाही. मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा वा इतर कोणतेही आजार असतील तर त्यांची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे संसर्गाच्या सर्वाधिक शक्यता असलेल्या कक्षेत येणारे रुग्ण यातून सुटतात व आजारांच्या माहितीचे व्यवस्थित संकलन होत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम controversy between doctor patients over registration of corona symptoms
करोना लक्षणांच्या नोंदणीमुळे डॉक्टर-रुग्णांमध्ये वाद


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सर्दी-खोकला किंवा ताप तसेच करोनामध्ये दिसून येणारी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेल्या रुग्णांची माहिती सरकारला कळवण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. मात्र, ही माहिती दिल्यामुळे डॉक्टरांवर रुग्णांचा राग व्यक्त होत आहे. आजारासंदर्भातील माहिती ही गोपनीय असल्याने रुग्णाच्या संमतीशिवाय ती अन्य कुणालाही देता येत नाही. करोनाच्या चाचण्या करून घ्याव्यात, आजाराची माहिती दडवू नये अशी यामागील सरकारची भूमिका असली तरीही त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वादविवाद होत आहेत.

राज्याच्या विविध भागांतील डॉक्टरांनी यासंदर्भातील त्यांच्या अडचणी व नाराजी आरोग्य विभागाकडे कळवली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, 'ही माहिती देण्यासंदर्भात सरकारकडून निर्देश आले आहेत. मात्र अशाप्रकारे रुग्णाची माहिती देणे योग्य आहे का याची विचारणा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे करण्यात येणार आहे.' नागपूर येथे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, जनरल प्रॅक्टिशनरकडे दररोज ७० ते ९० रुग्ण येतात. या रुग्णांच्या लक्षणानुसार डॉक्टर त्यांना कोविडची चाचणी करून घेण्याचा सल्ला देतात. त्यांचे नाव, नंबर, पत्ता अशी माहिती नेमून दिलेल्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे संध्याकाळी कळवण्यात येते. या रुग्णांना सरकारी आरोग्य यंत्रणामधून फोन गेल्यानंतर ते अस्वस्थ होतात. करोनाची चाचणी करण्यास नकार दिलेल्या व आजार अंगावर काढलेल्या काही रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. त्याची जबाबदारीही डॉक्टरांवरच ढकलण्यात येते. या मृत्यूचे विश्लेषण करताना समितीला कोणत्या डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार केले होते, याची माहिती दिली जाते. मात्र रुग्णाने करोनाची चाचणी केली नाही हे सांगितले जात नाही. या चाचण्या न करण्यासाठी डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे.

सोलापूर येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. जी. एम. मोंदे म्हणाले, 'ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी अशी लक्षणे असलेला प्रत्येक रुग्ण करोनाचा नसतो. त्यामुळे दोन-तीन दिवसांमध्ये लक्षणांची तीव्रता कमी न झाल्यास चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात होता. आता मात्र भीतीने डॉक्टर या चाचण्या लगेच करा, असे सांगतात. औषधांच्या चिठ्ठीवर यापूर्वी तशी नोंद केली जात नव्हती. त्यामुळे रुग्णाने चाचणी करण्यास नकार दिला हे डॉक्टरांना सिद्ध करता येत नाही.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज