म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांना शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आता रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्यात दररोज साडेचार हजार नागरिकांना रक्ताची गरज भासते. करोनाची लागण झालेल्या रुग्णांनादेखील रक्ताची गरज भासत असल्याने राज्याला एकूणच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री याबाबत वारंवार आवाहन करत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन आपापल्या विभागांमध्ये शासकीय यंत्रणांची मदत घेऊन तसेच सुरक्षेचे सर्व निकष पळून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन समितीतर्फे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे. यापूर्वी लालबागचा राजा, सार्वजनिक भटवाडी यांसह अनेक मंडळांनी विविध माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.