अ‍ॅपशहर

प्रमाणपत्रे न आल्याने रखडले दीक्षांत समारंभ

गेल्या वर्षीप्रमाणे मुंबई विद्यापीठाने यंदाही कॉलेजांना दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची सूचना केली आहे. मात्र, परीक्षा विभागाने बहुतांश कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे न पाठविल्यामुळे कॉलेजांमधील दीक्षांत समारंभ रखडले आहेत. यंदा विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निधीही न देण्याचा निर्णय दिल्याने त्यावरून कॉलेजांनी परीक्षा विभागावर जोरदार टीका केली आहे.

Maharashtra Times 20 Feb 2017, 4:09 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम convocation ceremony stalled in mumbai
प्रमाणपत्रे न आल्याने रखडले दीक्षांत समारंभ


गेल्या वर्षीप्रमाणे मुंबई विद्यापीठाने यंदाही कॉलेजांना दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची सूचना केली आहे. मात्र, परीक्षा विभागाने बहुतांश कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे न पाठविल्यामुळे कॉलेजांमधील दीक्षांत समारंभ रखडले आहेत. यंदा विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निधीही न देण्याचा निर्णय दिल्याने त्यावरून कॉलेजांनी परीक्षा विभागावर जोरदार टीका केली आहे.

उच्च शिक्षणाच्या प्रवासात दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आहे. मात्र, पूर्वी फक्त विद्यापीठ पातळीवरच हा दीक्षांत समारंभ होत असल्याने अनेक विद्यार्थी त्यापासून मुक्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने गेल्या वर्षीपासून विद्यापीठाबरोबरच कॉलेजांनाही दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार यंदाच्या दीक्षांत समारंभासाठी कॉलेजांना २८ जानेवारीपासून ते २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील तिसरा आठवडा उजाडला तरी अनेक कॉलेजांमध्ये अद्याप विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे प्रमाणपत्र (डिग्री) पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे कॉलेजांनी या दीक्षांत समारंभाचे आयोजन न केल्याची माहिती कॉलेजांकडून देण्यात आली आहे. अनेक कॉलेजांच्या प्रतिनिधींनी गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा विभागात खेटेही मारले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच पडली. मुख्य म्हणजे, गेल्यावर्षी विद्यापीठाने प्रत्येक कॉलेजांना दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी प्रतिविद्यार्थी काही रक्कम दिली होती. यंदा, मात्र ही रक्कम मिळणार नसल्याने काही कॉलेजांना हात आखडता घेतल्याचे कळते. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कॉलेजांमध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. मी स्वतः दोन कॉलेजांमध्ये या समारंभांसाठी उपस्थित होतो. कोणत्या कॉलेजांना डिग्री मिळाल्या नसतील तर त्यांनी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क साधावा. त्यानंतरही कोणत्या कॉलेजांना डिग्री मिळण्यास अडथळे असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा’, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज